Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 March, 2010

जिल्हा पंचायतींच्या निकालावरून विधानसभेचे अंदाज बांधणे चुकीचे

पर्रीकर यांचे स्पष्टीकरण
मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): जिल्हा पंचायत निवडणुका ह्या पक्षीय स्तरावर लढविल्या गेलेल्या नाहीत व त्यामुळे कोणा पक्षाला बळकटी मिळण्याचा किंवा कोणाचा सफाया होण्याचा प्रश्र्नच उद्भवत नाही. या निकालावरून विधानसभा निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही असे सांगून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत समर्थन दिलेले व पक्षासाठी इभ्रतीचे असलेल्या सर्व जागा जिंकलेल्या आहेत असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केले.
पंचायत किंवा जिल्हा पंचायतींना सरकारबरोबरच राहणे क्रमप्राप्त असते, त्यामुळे निवडून आलेल्यांनी आता काहीही सांगितले तरी आपण त्यांची चूक मान्य करत नाही; पण काही राजकारणी आता जो विजयाचा दावा करीत आहेत त्याला आपला आक्षेप असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. एवढा आत्मविश्र्वास होता तर त्या निवडणुका पक्षीय स्तरावर का लढविल्या गेल्या नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दक्षिण गोव्यात जर त्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले आहे तर उपाध्यक्षपद भाजप समर्थकाला देण्याचे औदार्य कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. सरकारबरोबर राहिले नाही तर कॉंग्रेसवाले या संस्थांची विकासकामात प्रत्येक ठिकाणी अडवणूक करतात हा आजवरचा अनुभव आहे. आपण मुख्यमंत्री असताना अशा सर्वच संस्था सरकारबरोबर होत्या. उद्या भाजप सरकार आले तर त्यांची पुन्हा रांग लागेल, असेही ते म्हणाले.
या निवडणुकांवरून विधानसभा निवडणुकीचा अंदाज बांधता येणार नाही असे सांगून विजयी झालेल्या उमेदवारांची मते एकत्र केली तरी ती लाखावर जाणार नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये दुफळी नको म्हणून काही ठिकाणी आपण मध्यस्थीसाठी गेलो व त्यात यश आले. अपवाद फक्त फातर्पा मतदारसंघाचा होता. तेथे शेवटच्या दोन तीन दिवसांत आपण पोचलो, अगोदर गेलो असतो तर ती जागाही पक्षाच्या समर्थकाला मिळाली असती, असे ते म्हणाले.

No comments: