Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 10 February, 2010

...तर पंचवाडीवासीय विधानसभेवर धडकतील

मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेणार
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पंचवाडीवासीय आपल्या अस्तित्वासाठी लढा देत असताना जनतेचे कैवारी म्हणून मिरवणारे सरकार तोंडात बोळा घालून गप्प कसे काय बसले आहे, असा संतप्त सवाल पंचवाडी बचाव समितीने केला आहे. "आम आदमी' चे मुख्यमंत्री म्हणवणारे दिगंबर कामत हेच खाण खात्याचेही मंत्री आहेत, त्यामुळे आता पंचवाडीवासीयांना त्यांनाच याचा जाब विचारावा लागेल. पंचवाडीतील नियोजित खाण प्रकल्प रद्द करण्याचे ठोस आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिले नाही तर संपूर्ण पंचवाडी गाव पर्वरी विधानसभेवर धडकतील, असा गर्भित इशारा यावेळी समितीने दिला.
पंचवाडी बचाव समितीकडून नियोजित सेझा गोवा खाण कंपनीच्या प्रकल्पाला विरोध होत असल्याने सध्या त्यांना मोठ्या प्रमाणात धमक्यांचे फोन येत असल्याची खबर आहे. याप्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना भेटण्याची तयारी दर्शवली असून हा प्रकल्प पंचवाडीसाठी कसा घातक ठरेल, याची विस्तृत माहितीच त्यांना करून देण्याचे समितीने ठरवले आहे. दरम्यान, राज्यातील जनतेला सरकारचा आधार आधार असतो पण पंचवाडीबाबत सध्या जो प्रकार सुरू आहे तो पाहता विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने पंचवाडी गावाला वाळीत टाकले आहे की काय, असा संशय निर्माण होतो,अशी प्रतिक्रिया माजी सरपंच तथा पंचवाडी बचाव समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केली. पंचवाडी हा भाग अजूनही विकासापासून वंचित आहे व शेती,बागायती तसेच इतर कृषीसंबंधी व्यवसाय हाच येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. सेझा गोवा खाण कंपनीच्या कोडली ते पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पामुळे या गावात विकासाची गंगा वाहेल व येथील कवडीमोल जमिनीला सोन्याचे दर प्राप्त होतील, असे म्हणून या प्रकल्पाचे समर्थन करणारे लोक किती स्वार्थी आहेत, हे लक्षात येते,असेही ते म्हणाले. या नियोजित प्रकल्पामुळे गावचा विकास सोडाच पण गाव भिकेला लागेल व उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याने पंचवाडीवासीयांवर उपासमारीची वेळ ओढवेल,असा धोका श्री.डिकॉस्ता यांनी बोलून दाखवला. एकदा हा सेझाचा प्रकल्प इथे आला की या भागातील लोकांनी आपल्या जमिनी बिल्डरांना विकून अन्यत्र स्थलांतर करावे,असाच सरकारचा कट आहे की काय,असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. ट्रक व्यवसाय व इतर रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे आमिष काही लोकांना कंपनी व सरकारकडून दाखवले जात असले तरी त्यामागे केवळ त्यांचा स्वार्थ असून हा प्रकल्प पंचवाडीवासियांना अजिबात परवडणारा नाही,असेही समितीचे म्हणणे आहे.

No comments: