Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 7 February, 2010

रामदेवबाबांनी नेत्यांना दिले योगाचे धडे!

गोवा पाठ्यक्रमात योगाच्या समावेशाचे संकेत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- गोव्यात शालेय पाठ्यक्रमात योग शिक्षणाचा समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून येत्या काळात योग शिक्षण हा शालेय शिक्षणक्रमाचाच महत्त्वाचा भाग ठरेल, असा विश्वास स्वामी रामदेवबाबा यांनी व्यक्त केला.
पातंजली योग समिती व भारत स्वाभिमान यांनी गोवा विधिमंडळ मंचाच्या सहकार्याने आज गोवा विधानसभेत सर्व आजी, माजी आमदार, मंत्री व कर्मचारीवर्ग यांच्यासाठी मार्गदर्शनाचा खास कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामी रामदेवबाब यांनी जीवनातील योगसाधनेचे महत्त्व विषद करून तणावमुक्तीसाठीच्या महत्त्वाच्या टीप्स उपस्थितांना दिल्या. दिवसातून किमान पंधरा मिनिटे योगसाधना करा व निरोगी तथा तणावमुक्त जीवन जगा,असा कानमंत्रच त्यांनी यावेळी दिला.
व्यक्तिविकास हाच राष्ट्रविकास आहे,असे सांगून जेव्हा प्रत्येक भारतीय निरोगी व निर्भय बनेल तेव्हाच आपला देश शक्तिशाली व वैभवशाली बनू शकेल. याप्रसंगी त्यांनी अल्पकाळासाठी करण्यात येणारे काही योगाच्या प्रकारांचे प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करून घेतली.
या कार्यक्रमानंतर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या दालनात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भारत स्वाभिमान व पातंजली योग समितीच्या कार्याचा आढावा घेतला. गोव्यात सुरुवातीला २००५ साली केवळ ७ योग प्रशिक्षक होते.आता ही संख्या २४४४ पर्यंत पोहचली आहे.पातंजली योग समितीने आरंभलेल्या कार्याचे उद्दिष्ट गाठण्यात हे राज्य अग्रेसर असल्याचेही ते म्हणाले. गाव तिथे योग केंद्र ही मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत राज्यात १५७० योग केंद्रे सुरू करण्याचाही विचार आहे,अशी माहिती त्यांनी दिली.
विशेष म्हणजे ही सगळी निःशुल्क केंद्रे आहेत.निरोगी व समृद्ध गोवा निर्माण करण्यासाठी सर्वांनी भारत स्वाभिमान संघटनेत सहभागी व्हावे.योगाच्या माध्यमाने सर्व जात,पात,धर्म,भाषा,प्रांत आदी मतभेद दूर होतील व योग या एकमेव सूत्राने सारे भारतीय एकत्र बांधले जातील,असेही ते म्हणाले. पातंजली योग समितीच्या कार्यात मुस्लिम व ख्रिस्ती बांधवांचाही मोठा सहभाग असल्याची माहिती त्यांनी दिली.
योगसाधनेच्या माध्यमाने आंतरिक शक्तीत चैतन्य निर्माण होते व आपोआपच वाईट गुण नष्ट होतात. राजकीय भ्रष्टाचार व अस्थिरता दूर करण्यातही योग महत्त्वाची भूमिका वठवणार आहे. येत्या काळात भारत स्वाभिमान संघटना मजबूत होईल व चांगले लोक निवडून आणून त्यांच्याकडे लोकांचे प्रतिनिधित्व सोपवले जाईल; पण त्यासाठी संघटनेचा विस्तार होण्याची गरज आहे व त्यात थोडा अवधी जाईल,अशी माहिती त्यांनी दिली.
सत्य, राष्ट्रभक्ती व प्रामाणिकपणा जपणारे सगळे लोक आपल्याला प्रिय आहेत,असे सांगून आपण राजकीयभेदाभेद करत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हरीव्दार येथे पातंजली योग समितीतर्फे देशातील सर्वांत मोठा खाद्य प्रक्रिया प्रकल्प राबवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. या प्रकल्पामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळायलाच हवा,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी जयदीप आर्य व डॉ. सूरज काणेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी आमदार मोहन आमशेकर यांनी केले.

No comments: