Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 9 February, 2010

खोतोडेतील खाणींमुळे पर्यावरणाची जबर हानी

वाळपई, दि. ८ (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यातील वाळपई खोतोडे येथे सुरू असलेल्या खाणींमुळे पर्यावरणाची जबरदस्त हानी होत आहे. त्यामुळे तेथील पर्यावरणवादी आणि स्थानिकांत कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर बागायतींवर संकट कोसळले असून कुळागरे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
या भागात सध्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरून खनिज मालाची वाहतूक ट्रकांतून केली जात असून यावर संबंधित सरकारी यंत्रणेचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. बेदरकारपणे होणाऱ्या खनिज वाहतुकीमुळे खोतोडे भागात प्रचंड धूळ प्रदूषण होत त्यामुळे येथील पर्यावरण, बागायती, कुळागरे व नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे.
गुळेली भागातून होणाऱ्या खाण वाहतुकीमुळे तेथील नागरिक त्रस्त बनले असून या संदर्भात आपले गाऱ्हाणे संबंधित खात्याकडे नेण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. या खनिज वाहतुकीमुळे बिंबल - फोंडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांवर धूळ साचते. तसेच रस्त्याच्या बाजूलाच असलेली कुळागरे व कुळागरांतील सुपारी, नारळ, केळी इत्यादी बागायती पिकांवरही धूळ साचत असल्यामुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम होत आहे. या बागायतींचे उत्पन्न घटत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, आंबेलीतील बंद करण्यात आलेल्या बेकायदा खाणींचे माल वाहतूक करणारे ट्रक खोतोडेतील अन्य खाणींच्या ट्रकांबरोबर बेमालूमपणे घुसवले जात असल्याचीही खबर मिळाली आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. मात्र संबंधित खाते राजकीय दबावामुळे या वाहतुकीवर कोणतीच कारवाई करत नसल्याचे चित्र दिसते आहे.
दरम्यान, वृत्तपत्रांतून सातत्याने खोतोडे खाणीसंदर्भात बातम्या प्रसारित होत असल्यामुळे या भागात प्रचंड खळबळ माजली असून, आता अनेक नागरिकांनी या खाणींच्या विरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. यामुळे सत्तरीतील राजकारणही ढवळून निघाले असून येत्या जिल्हा पंचायत निवडणुकीत हा एक मोठा मुद्दा बनणार असल्याची चर्चा वर्तविण्यात येते आहे.
खोतोडे पंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असून खाणीसंदर्भात सदर पंचायतीने घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेमुळे विरोधकांना आयतीच संधी प्राप्त झाली असून याचा विपरीत परिणाम सत्ताधारी गटावर होण्याची चिन्हे आहेत.
सत्तरीच्या पत्रकारांतर्फे "त्या' घटनेचा निषेध
सत्तरी तालुक्यातील आंबेली येथे ज्या खाणीला सील ठोकण्यात आले आहे त्या खाणीची छायाचित्रे घेण्यासाठी गेलेले "गोवादूत'चे प्रतिनिधी पद्माकर केळकर यांना तेथील एका खाण अधिकाऱ्याने अटकाव केल्याबद्दल सदर घटनेचा सत्तरी रिपोर्टर फोरमने कडक निषेध केला आहे. त्या अधिकाऱ्यावर सरकारने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी फोरमचे अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी केली आहे.

No comments: