Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 February, 2010

३००० कुडचडेवासीयांची बगलमार्गासाठी भव्य रॅली

कुडचडे, दि. १० (प्रतिनिधी): खाण व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याची गरज असतानाही सत्ताधारी सरकारने १७०० हेक्टर जमीन वनक्षेत्र वळवून खाणीसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कुडचडेवासी मृत्यूच्या छायेत असूनसुद्धा बगलरस्त्यासाठी गरजेची असलेली वनक्षेत्रातील केवळ ७ हेक्टर जमीन मालवाहतुकीस वापरण्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी सरकार सुस्तीचे धोरण वापरत असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज कुडचडे येथे केला.
येथे "द पीपल्स मुव्हमेंट'च्या चळवळीतून येथील जनतेला भेडसावत असलेल्या खाण समस्येवर उपाय काढण्यासाठी सरकारने बगलरस्त्याच्या एकमेव पर्याय निवडण्याच्या मागणीसाठी आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना श्री. पर्रीकर यांनी सरकारच्या सुस्त कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
सदर रॅलीमध्ये न्यू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, सर्वोदया, चंद्रभागा तुकोबा नाईक उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसह सुमारे ३००० लोक सहभागी झाले होते. यात सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला सारून आपला पाठिंबा व्यक्त केला होता. कुडचडे बाजारातील दुकानेही यानिमित्त बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे स्टेशन, कामत हॉस्पिटल, आंबेडकर चौक या मार्गावरून रॅली काढण्यात आली होती. शेवटी सुडा मार्केटसमोरील खुल्या जागेत रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर ऍड. नरेंद्र सावईकर, कुडचडेचे नगराध्यक्ष परेश भेंडे, नगरसेवक प्रदीप नाईक, मिशन बायपासचे प्रदीप काकोडकर, ट्रकमालक संघटनेचे रघुनाथ नाईक, बस संघटनेचे मान्युएल फर्नांडिस, कॉंग्रेसचे माजी गटाध्यक्ष मनोहर नाईक, शिवसेनेचे धनंजय नाईक, व्यापारी संघटनेचे हनुमंत वस्त व इतर मान्यवर उपस्थित होते. तर रॅलीमध्ये डॉ. शीतलकुमार काकोडकर, रायसू नाईक, माजी आमदार विनय तेंडुलकर, माजी नगराध्यक्ष अभय खांडेकर, नगरसेवक मारुती नाईक, देऊ सोनू नाईक, व्यापारी, बस व ट्रक मालक यांचा सहभाग होता.
ऍड. सावईकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पर्रीकर सरकारने आपल्या कारकिर्दीत ओल्ड गोवा येथे केवळ चार महिन्यांत बगलरस्त्याचे काम पूर्ण केले होते. कॉंग्रेस सरकार मात्र जनतेची दिशाभूल करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदीप काकोडकर यांनी कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा न दर्शवण्याच्या कृतीचा निषेध केला. आमदाराकडून सरकारला ३१ मार्च पर्यंत देण्यात आलेली मुदत केवळ ७ हेक्टर जमिनीसाठी आहे, राहिलेल्या रस्त्याचे काय, असा सवाल त्यांनी केला. सरकारकडून ६ महिन्यांत एखादी फाईल पुढे पाठवण्याची क्षमता नसेल तर सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सतीश काकोडकर यांनी कुडचडेवासीयांवर हिरोशीमा व नागासाकीप्रमाणे खाणीचे अणुबॉंब टाकण्यात येत असल्याची टीका केली. यातून जनतेच्या आरोग्यावर भयंकर परिणाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बगलरस्त्यासाठी एक खास पथक तयार करून केंद्र सरकारकडे पाठवण्याची गरज नगराध्यक्ष परेश भेंडे यांनी व्यक्त केली. एकेकाळी अग्रेसर असलेला कुडचड्याचा व्यापार आज आता बंद होत चालल्याची खंत व्यापारी संघटनेतर्फे हनुमंत वस्त यांनी व्यक्त केली.

No comments: