Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 11 February, 2010

किरण बेदींसमोरच निष्क्रिय सरकारचे वाभाडे

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. किरण बेदी यांच्या स्फूर्तिदायक व्याख्यानातून प्रोत्साहित झालेल्या युवकांनी व नागरिकांनी आज व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरावेळी आपल्या सरकारच्या अकार्यक्षमतेची व पोलिस खात्याच्या निष्क्रियतेची जंत्रीच विविध प्रश्नांच्या निमित्ताने सादर केल्याने सरकारचे वाभाडेच निघाले. या प्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, इतर प्रशासकीय अधिकारी व खास करून महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष डॉ. प्रमोद साळगावकर यांची मात्र बरीच नाचक्की झाली. सरकारचे वाभाडे काढणारे सवाल उपस्थित होत असताना मुख्यमंत्री केवळ हसतच होते, असे आढळल्याने मुख्यमंत्री फक्त हसतात पण उत्तरे देत नाहीत, असा टोलाही डॉ. किरण बेदी यांनी यावेळी हाणल्याने त्यांची भंबेरी उडाली.
डॉ. बेदी यांच्या सडेतोड भाषणामुळे प्रेरित झालेल्या एका विद्यार्थिनीने उभे राहून राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या प्रकरणांबाबत नाराजी व्यक्त केली. आज विविध ठिकाणी महिलांची छेडछाड व छळ सुरू असल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले. गोवा विद्यापीठातील एका माजी प्राध्यापकाकडून लैंगिक छळाची तक्रार नोंद करूनही अद्याप काहीही कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत करावे तरी काय, असा खडा सवाल तिने उपस्थित केला. यावेळी डॉ. बेदी यांनी कथीत विशाखाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल व अशा प्रकरणी लैंगिक छळवणूक चौकशी समितीतर्फे चौकशी व्हावी, असे सांगितले. या प्रकरणाची चौकशी झाली पण कारवाई नाही. माहिती अधिकाराखाली अहवाल मागितला तर तो गोपनीय असल्याचे निमित्त पुढे करून टाळण्यात येतो, असेही सांगितले. या सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर, कुलसचिव डॉ. मोहन सांगोडकर आदी उपस्थित होते. त्यामुळे काहींनी त्यांना जाब विचारावा, अशीही मागणी केली. पण ही "आपकी कचेरी' मालिका नाही, असे म्हणून डॉ. बेदी यांना लोकांना शांत करणे भाग पडले. एका महिला व्याख्यातीने महिलांवरील अत्याचाराबाबत बोलताना पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध केला. विदेशी अल्पवयीन मुलांवरील लैंगिक छळ, महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे वाढत आहेत पण ते हाताळण्यात पोलिस कमी पडत आहेत. पण हे नेमके का घडत आहे, असा सवाल तिने केला. सदर व्याख्यातीने कथन केलेल्या घटनांबाबत स्पष्टीकरण देणेही कठीण असल्याने अखेर राज्यात चांगले पोलिस प्रशासन हवे तर त्यासाठी चांगले राजकीय नेतृत्व हवे, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. गोव्यात अशा घटना का होतात याचा अभ्यास करण्याची गरज आहे, त्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे. एकदा का या घटनेमागची कारणे स्पष्ट झाली व त्यावर उपाय लगेच काढता येतील व उपाय तयार असले की कारवाईही तेवढीच लवकर होईल, असे सांगून मुख्यमंत्री कामत यांनी याबाबत जरूर विचार करावा, असेही त्या म्हणाल्या. आपण गोव्यात सेवा बजावल्याने या घटनांमुळे आपल्यालाही खरोखरच दुखः होते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गोव्याचे नाव या घटनांमुळे बदनाम होत असल्याचे मान्य करून गोव्याच्या लोकप्रियतेवर हा काळा ठपका ठरत असल्याची जाणीवही त्यांनी करून दिली. या गोष्टींकडे "झिरो टोलरन्स'च्या नजरेतून पाहिल्यास व कायद्यासमोर कुणाचीच गय होत नसेल तर ही प्रकरणे तात्काळ आटोक्यात येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सेवा बजावत असताना राजकीय नेते किंवा इतर बड्यांशी दोन हात करताना भीती वाटली नाही काय, किंवा कुटुंबाचा विचार मनात आला नाही काय, असा सवाल एका विद्यार्थिनीने केला. प्रत्येक कृतीचा परिणाम हा असतोच. आपली सेवा बजावताना त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्याचे धाडस स्वीकारणार की भेकडपणाला कवटाळणार हा ज्याने त्याने विचार करावा, असा प्रतिप्रश्नच त्यांनी केला. एकात्मता व धाडस असेल तर कुठलेही नेतृत्व लोकाभिमुख होते. प्रत्यक्ष रस्त्यावर उतराल तेव्हाच जनतेचे खरे प्रश्न व समस्या समजतील. सरकारची लोकप्रियता जनता ठरवेल, आपण कितीही बढाया मारल्या तरी तो उपयोगाचा नाही, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. राज्यात आदर्श ठेवण्यालायक एकही नेता कसा का नाही,असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला असता त्याचे उत्तर मुख्यमंत्री देतील, असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाहिले. एकूणच डॉ. बेदी यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहिलेले नेते, प्रशासकीय अधिकारी व पोलिस अधिकारी यांची मात्र जनतेने केलेल्या टीकेमुळे नाचक्कीच झाली.

1 comment:

akshar said...

this was a wonderful news!