Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 February, 2010

"चक्र व्ह्यू' रेव्ह पार्टी अखेर रद्द

उपजिल्हाधिकांऱ्यांकडून परवाने मागे
"गोवादूत'चा दणका


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - आगोंद येथील जंगलात बुधवारपासून होऊ घातलेल्या "चक्र व्ह्यू' या रेव्ह पार्टीच्या आयोजनाविरुद्ध "गोवादूत' ने आवाज उठवल्यानंतर आज उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका खास आदेशाने या पार्टीसाठी देण्यात आलेले परवाने मागे घेतल्याने आता ही वादग्रस्त पार्टी रद्द करण्यात आली आहे. "गोवादूत'ने प्रथम यासंंबंधीचे वृत्त २ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या काणकोणवासीयांनी आणि तेथील संघटनांनीही या पार्टीला जोरदार विरोध केला होता. हिंदू जनजागृती समितीनेही यासंबंधी उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांना निवेदन देऊन जोरदार विरोध दर्शविला होता.
आगोंद येथील जंगलात या पार्टीचे आयोजन करण्यात आले तर त्यामुळे वनसंपत्तीची हानी तर होईलच; शिवाय रेव्ह पार्टीत सर्रास उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अमली पदार्थांमुळे परदेशींबरोबरच स्थानिक युवापिढीही बरबाद होईल, अशी शक्यता "गोवादूत'ने व्यक्त केली होती. स्थानिक आमदार विजय पै खोत आणि रमेश तवडकर यांनीही यासंबंधी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून या पार्टीला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून पोलिस अहवालानुसार रेव्ह पार्टीसाठी २८ जानेवारी रोजी देण्यात आलेला ध्वनिक्षेपक वापरासाठीचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. वृत्तपत्रातील बातम्यांनुसार या पार्टीमध्ये अमली पदार्थांची रेलचेल असेल तसेच अन्य गैरप्रकार घडतील, याची शक्यता पडताळून पाहाण्याचा आदेश काणकोण पोलिस निरीक्षकांना देण्यात आला, तसेच आयोजकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पोलिस अहवालातील शिफारशीनुसार बंगलोर येथील "स्पायरल प्रॉडक्शन'चे संतोष कद्री यांना देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात आला असल्याचे उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
पोलिसांनी सादर केलेला अहवाल, वृत्तपत्रांतील बातम्या, जनता आणि संघटनांनी व्यक्त केलेली विरोधी प्रतिक्रिया, आयोजकांनी पाठविलेले उत्तर आणि हिंदू जनजागृती समितीने दिलेले निवेदन याचा विचार करूनच या पार्टीला देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या पार्टीमुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता आहेच; शिवाय वेगवेगळ्या देशांतून मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे ध्वनिप्रदूषण आणि त्याचबरोबर अमली पदार्थ आणि मद्याचा अमर्याद वापर होण्याची शक्यता असल्याने यावर नियंत्रण ठेवणे पोलिस अथवा प्रशासकीय यंत्रणेला शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन पार्टीसाठी देण्यात आलेले परवाने मागे घेत असल्याचे श्री. देसाई यांनी आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे.

No comments: