Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 February, 2010

खोतोडे खाण - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले?

वाळपई, दि. ५ (प्रतिनिधी) - सध्या सत्तरी तालुक्याला खाण व्यवसायाने पुन्हा एकदा आपला अभद्र वेढा द्यायला सुरुवात केली असून वाळपई - फोंडा या महामार्गावरून हल्लीच नवीनच खोतोडे - गावणे येथे सुरू झालेल्या खाणींचे ट्रक रोरावत आहेत. यामुळे गेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या, "गोव्यात कोणत्याही नवीन खाणी सुरू करायला परवानगी दिली जाणार नाही', या आश्वासनाची पायमल्ली झाली असून आपल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे की आपले पद शाबूत राखण्यासाठी मागील दाराने ते जाणीवपूर्वक या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत याविषयी या भागात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यासंबंधी आज (दि. ४) दै. "गोवादूत' खोतोडे - गावणे येथील बेकायदा खाणीसंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच आज सर्वत्र याविषयीच चर्चा होती. या भागात बंद पाडण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करून गेल्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला गेला आहे. सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघातील खोतोडे - गावणे येथे एका कंपनीने लोकांचा विरोध डावलून बेकायदा खाण सुरू केली आहे. गेल्या वर्षी येथील खाणीचा विषय बराच गाजला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या मुद्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरले होते. स्थानिकांनी उभारलेले आंदोलन आणि विधानसभेत होत असलेली कोंडी यामुळे शेवटी त्यांना या खाणीसंदर्भात होऊ घातलेली सुनावणी रद्द करावी लागली होती. यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही नव्या खाणींना परवाना दिला जाणार नाही असे आश्वासन दिले होते. यात विशेषतः पश्चिम घाटातील खाणी व वनक्षेत्रांतील खाणींचा समावेश होता. या आश्वासनाला पुरते एक वर्षही उलटले नाही तोच खोतोडे भागात पुन्हा खनिज उत्खनन सुरू करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे येथील लोकांनी बोलून दाखवले आहे.
दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यमान सरकारातील एक "बडा' मंत्रीच सरकारवर दबाव आणून या व्यवसायाला छत्रछाया पुरवत आहे. त्यासाठी संबंधित गावातील लोकांना व खास करून युवकांना रोजगाराची व पैशांची आमिषे दाखवण्यात येत असल्याची चर्चा आहे. विकासाच्या नावावर लोकांचे मतपरिवर्तन घडवून आपला स्वार्थ साधण्याचे कुटील कारस्थान रचले जात असल्याचे बोलले जात आहे. खोतोडेनंतर खडकी, वेळगे, सोनाळ, धावे व ब्रह्माकरमळी या गावातही खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.
दरम्यान, येथील पर्यावरणवादी आणि सुज्ञ नागरिकांनी या नेत्याचा आणि पर्यायाने सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा निश्चय केला असून येत्या अधिवेशनात विरोधकांच्या माध्यमातून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे सूचित केले आहे. या संपूर्ण व्यवसायाचा पर्दाफाश करण्याचे येथील युवकांनी ठरवले असून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याचेही निश्चित केले गेले आहे. या खाणीविरोधात एका मंचाची स्थापना करण्याचेही ठरवण्यात आले आहे. येथील नागरिक यासंदर्भात लवकरच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार असल्याचे व त्यांना ही खाण बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन सादर करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

No comments: