Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 February, 2010

एकसंध पंचवाडीवासीयांत फूट पाडण्यासाठी जोरदार हालचाली


विजर खाजन बंदर प्रकल्पाविरोधात लोक आक्रमक


पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन येथील बंदर प्रकल्प याबाबतचा विरोध अधिकाधिक आक्रमक होत चालला आहे. गावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी एकसंधपणे हा डाव हाणून पाडायचे ठरवल्याने सेझा गोवा कंपनीच्या शेपटीवरच पाय पडला आहे. लोकांच्या आक्रमकतेमुळे बिथरलेल्या विरोधकांनी आता या ग्रामस्थांतच कलह निर्माण करण्याचे प्रयत्न चालवल्याने या विषयावरून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकल्पाला पाठिंबा देणारे काही राजकीय नेते कंपनीच्या संगनमताने ग्रामस्थांच्या एका गटाला पुढे करून त्यांना या प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे करण्याचे षडयंत्रही रचत असल्याची खबर आहे. पंचवाडी गावातीलच काही लोकांना पुढे करून या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प उभारण्याचा ठाम निर्धार कंपनीकडूनही व्यक्त झाला आहे. सदर कंपनीकडून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना हाताशी धरून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना ट्रक व्यवसाय व काहींना रोजगाराची संधी मिळेल, असे सांगून फूस लावली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पंचवाडी येथील विजर खाजन बंदर प्रकल्पाविरोधात येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या नियोजित प्रकल्पामुळे पंचवाडी गावावर धूळ प्रदूषणाचे संकट तर ओढवणार आहेच, शिवाय येथील शेती, बागायतीही नष्ट होणार आहेत. सेझा गोवा खाण कंपनीच्या हितासाठी सरकार सुमारे ५ लाख ५४ हजार शेत, बागायती व ओलीत क्षेत्रातील जमीन खनिज रस्त्यासाठी व कंपनीच्या खाण मालाची हाताळणी करण्यासाठी देत आहे.
पंचवाडीतील संपूर्ण परिसर हा हिरव्यागार शालीसारखा आहे. शेती, बागायती ही येथील लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने आहेत. असे असताना पंचवाडीवासीयांना देशोधडीला लावून खाण कंपनीची तळी उचलून धरणारे हे सरकार गोमंतकीयांच्या मुळावरच उठले आहे की काय, असा रोकडा सवालही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या नियोजित बंदर प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाचे वृत्त दै."गोवादूत'मधून सातत्याने प्रसिद्ध होत असल्याने सरकार व संबंधित कंपनीचे धाबे दणाणले आहेत. पंचवाडीतील लोकांत मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे व या प्रकल्पाच्या विरोधात जनमत बनत चालले आहे. पंचवाडीचा नाश कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. सरकार व कंपनीकडून पंचवाडीवासीयांना कितीही आमिषे किंवा लालूच दाखवली गेली तरी पंचवाडीचे रक्षण करण्यास येथील ग्रामस्थ समर्थ आहेत, याची जाणीव सरकारला करून देणार अशा इशाराही यावेळी पंचवाडीवासीयांनी दिला.

No comments: