Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 1 February, 2010

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीसाठी!

भाजपचा गंभीर आरोप

पणजी, दि. ३१, (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत निवडणूक अधिसूचना जारी होण्याआधी आपल्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या सोयीच्या पोलिस स्थानकात व कार्यक्षेत्रात घडवून आणण्यासाठी, कॉंग्रेस आमदारांनी राजकीय दबाव वापरून तसा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले आहे, ही लोकशाहीची क्रूर थट्टाच आहे.अशा बदल्या ताबडतोब थांबवण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रा. गोविंंद पर्वतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
सात जानेवारी रोजी जिल्हा पंचायत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली व नंतर २० जानेवारी रोजी उत्तर गोव्यातल्या दोन व दक्षिण गोव्यातल्या चार जागांविषयी बदल करण्यासाठीची दुरुस्ती अधिसूचना जारी करण्यात आली. हे बदल कोणाच्या सोयीसाठी व कोणा राजकीय दबावानुसार झाले ते त्या त्या ठिकाणच्या जनतेला माहीत आहेच,असे पर्वतकर यांनी म्हटले आहे.
अधिसूचना जाहीर झाल्यावर अनेक कॉंग्रेस आमदारांनी आपापल्या सोईनुसार मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. पण तेथे सर्वांचेच दबावतंत्र उपयोगात न आल्याने आता आपल्या सोईच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आपणास हव्या त्या जागेत करण्याचे षड्यंत्र रचण्यात आलेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्या प्रकरणात लक्ष घालून या बदल्या प्रत्यक्षात होऊ देऊ नये अशी भाजपची आग्रही मागणी आहे. लोकशाहीची थोडीतरी लाज असेल तर सरकारने या पोलिस अधिकाऱ्यांच्या ठरलेल्या बदल्या ताबडतोब रद्द कराव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे.

No comments: