Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 4 February, 2010

"विश्वकल्याणासाठी हिंदुत्वच!'

पणजीतील प्रकट बौद्धिकात मोहनजी भागवत यांचे उद्गार
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- देशात व पर्यायाने संपूर्ण विश्वात शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावयाचे असेल तर त्यासाठी हिंदुत्व हा एकमेव पर्याय आहे. भारताला लाभलेली उच्च जीवन संस्कृतीच या जगाला तारू शकते याची ओळख आता संपूर्ण जगालाही पटू लागली आहे. विविधेतून एकता साधायची असेल तर त्याला केवळ हिंदुत्व हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.
आज कांपाल येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते व नागरिकांच्या विराट सभेला प्रकट बौद्धिकांतर्गत प्रबोधन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर गोवा संघचालक राजाभाऊ सुकेरकर, दक्षिण गोवा संघचालक रामदास सराफ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर व कोंकण विभागाचे संघचालक बापूसाहेब मोकाशी उपस्थित होते.
अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या श्री. भागवत यांनी आपल्या ओघवत्या व प्रखर भाषणांत भारताच्या भवितव्याचा चौफेर आढावा घेतला. देशाच्या सुरक्षेपेक्षा मतपेढीचे राजकारण जेव्हा वरचढ ठरू लागते तेव्हा देशावर संकटांची गडद छाया पसरू लागते. आज बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोर भारतात दाखल झाले आहेत. आसाम राज्यावर त्यांनी केलेले अतिक्रमण पाहता हे राज्य भारतात राहील की नाही याबाबतच संशय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यातही हे घुसखोर शिरले आहेत. त्यांना हेरून, रेशनकार्डे व मतदार यादीतून त्यांची नावे वगळून त्यांना परत त्यांच्या देशात पाठवणे हेच सर्वांच्या हिताचे होईल, असेही ते म्हणाले. आपण मुत्सद्देगिरी सोडून केवळ शांततेच्या बाता मारीत बसलो आहोत तर तिथे चीन अत्यंत नियोजनपूर्वक आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो आहे. युद्ध सोडाच पण निदान मुत्सद्देगिरीच्या बळावर तरी त्याचा हा डाव हाणून पाडण्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी केला. एकीकडे भावनात्मक राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी करणे व दुसरीकडे मात्र संविधानाला अमान्य असलेली धार्मिक राखीवता राबवून मतांचे राजकारण करणे हे देशाला घातक ठरेल, असे स्पष्ट मतही त्यांनी वेळी जाहीर केले.
देशात हिंदूंची संख्या रोडावत चालल्याने एकामागोमाग एक समस्या उद्भवत आहेत. सगळ्यांना सामावून घेणारे एकच सूत्र म्हणजे हिंदुत्व. याच हिंदुत्वामुळे विश्वभरात भारत देशाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आज देशभरात संघाच्या सुमारे चाळीस हजार शाखा आहेत. संघ हा नेहमीच देशाचा विचार करतो व त्या अनुषंगानेच वावरतो. संघाच्या वर्णनावर जाऊ नका, त्यात गफलत होऊ शकेल पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तरच संघाच्या कार्याची ओळख पटेल. संघाच्या शाखेत सहा महिने किंवा वर्षभर सहभागी व्हा. इथे काहीही छुपेपणाने चालत नाही तर सर्व व्यवहार पारदर्शकपणे चालतो. संघाचा अनुभव घेऊन मगच खात्री करा व नंतर संघात राहायचे की नाही हे ठरवा. संघाचे सहयोगी कार्यकर्ता म्हणूनही देशकार्यात भाग घेण्याची मोकळीक आहे व देशबांधणीस त्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपला देश वाचवायचा असेल तर समाजाला सक्रिय करण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सुरुवातीस प्रास्ताविक केले. गोव्यात संघाची स्थापना होऊन ४८ वर्षे झाली. गोवा राज्य संघाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना येथील प्रत्येक शाखा बळकट, गुणात्मक, मजबूत बनवण्याकडेच कल असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनीच शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

No comments: