Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 5 February, 2010

पंचवाडीच्या ग्रामसभेला पोलिस बंदोबस्ताची मागणी


पंचवाडी बचाव समितीचे पोलिस महासंचालकांना पत्र

लढा पंचवाडीच्या अस्तित्वाचा


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)- फोंडा तालुक्यातील पंचवाडी ग्रामपंचायतीच्या येत्या ७ रोजी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पावरून वादळी चर्चा होणार आहे. पंचवाडीचा नायनाट करू पाहणाऱ्या या प्रकल्पाला अजिबात थारा देणार नाही, अशी सडेतोड भूमिका पंचवाडी बचाव समितीने घेतली आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे समर्थन करणारा एक गटही कार्यरत झाला असून त्यांनी ग्रामसभेत येन केन प्रकारेण या प्रकल्पाला मान्यता देणारा ठराव संमत करून घेण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ग्रामसभेच्या दिवशी गावात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून पंचवाडी बचाव समितीने यामुळे ग्रामसभेला कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांना देण्याचे ठरवले आहे.
कोडली खाण ते पंचवाडी या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित खनिज वाहतूक रस्ता व विजर खाजन येथील नियोजित खनिज हाताळणी बंदर या प्रकल्पावरून सध्या संपूर्ण पंचवाडी गाव ढवळून निघाला आहे. शिरोडा मतदारसंघ हा अजूनपर्यंत तरी खाण व्यवसायापासून मुक्त आहे. आता या नियोजित प्रकल्पाच्या मदतीने या सुलतानी संकटाला आमंत्रण दिले तर भविष्यात हा गाव पूर्णपणे खाणीच्या विळख्यात जाईल व राज्यातील इतर खाणग्रस्त भागांप्रमाणेच या निसर्गसुंदर गावाची दुर्दशा होईल, अशी भीती पंचवाडी बचाव समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केली. केवळ व्यवसाय व रोजगाराच्या आमिषांना बळी पडून संपूर्ण गावावरच हे संकट ओढवण्यास मदत केली तर पुढील पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. खाण कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा करार किंवा आश्वासने दिली गेली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. आज राज्यभरात सर्वत्र खाणग्रस्त भागांतील लोक खाण व्यवसायाच्या दुष्परिणामांमुळे बाधित झाले असताना पंचवाडीवासीयांनी या संकटाला स्वतःहून आमंत्रण देणे हा आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचाच प्रकार ठरेल, असेही क्रिस्टो म्हणाले. कंपनीच्या आमिषांना बळी पडू नका व एकजुटीने या प्रकल्पाविरोधात लढण्यास सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कंपनीला खुद्द राज्य सरकारची व काही राजकीय नेत्यांचीच फूस आहे. या राजकीय नेत्यांचे हित या नियोजित प्रकल्पांत दडले असून त्यांना विविध कंत्राटे मिळवून देण्याची आश्वासने देण्यात आली आहेत. गावातील शेतजमिनीला काहीही महत्त्व नाही, असे चित्र निर्माण करून लोकांना पैशांचे आमिष दाखवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अशा अवस्थेत किमान गावातील युवकांनी तरी पुढाकार घेऊन हा गाव कंपनीच्या घशात जाण्यापासून रोखावा; ७ राजी होणाऱ्या ग्रामसभेला गावातील सर्व नागरिकांनी जातीने उपस्थित राहावे व या प्रकल्पाविरोधात आपली ताकद सिद्ध करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

No comments: