Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 25 February, 2010

गेल्या दोन वर्षांपासून चीनची घुसखोरी कायम

केंद्र सरकारची अखेर कबुली
नवी दिल्ली, दि.२४ : भारतीय सीमेत चीनची घुसखोरी नसून त्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही, असे वारंवार सांगणाऱ्या केंद्र सरकारने, चीन गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे भारतात घुसखोरी करीत असल्याची कबुली दिली आहे.
केंद्रीय गृहराज्यमंत्री मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून चीन सातत्याने भारताच्या सीमा क्षेत्रात घुसखोरी करीत असल्याचे लक्षात आले आहे. लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या सीमा क्षेत्रातून चीन वेगवेगळ्या प्रकारने घुसखोरी करीत आहे. कधी आपली निगराणीची वाहने सोडून, कधी बोटींच्या माध्यमातून तर कधी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चीनने भारतीय हद्दीत शिरकाव करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, त्यातील बहुतांश वेळा सीमारेषेविषयी ज्ञान नसल्याने वाहने शिरल्याचे लक्षात आले आहे.
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने सीमेवर एखादी भिंत किंवा कुंपण उभारले आहे का, असे विचारले असता मंत्र्यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, चीनलगत असणारे भारतीय सीमाक्षेत्र हे बहुतांश पर्वतीय आहेत. त्यामुळे तेथे भिंत किंवा कुंपण उभारणे शक्य नाही.

No comments: