हैदराबाद, दि. २१ : वेगळ्या तेलंगणाच्या मागणीसाठी शनिवारी श्रीपुरम् यादय्या या युवकाने आत्मदहन केले होते. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने हे आंदोलन पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
उस्मानिया विद्यापीठ म्हणजे वेगळ्या तेलंगणावाद्यांचा बालेकिल्लाच बनला आहे. तेथे शेजारच्या रंगा रेड्डी जिल्ह्यातील नागाराम गावातील हा विद्यार्थी वेगळ्या तेेेलंगणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आला होता. आंदोलनाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विद्यापीठाच्या आवारात त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतले.
या प्रकाराने तेथील पोलिसही क्षणभर गोंधळून गेले. नंतर तातडीने हालचाल करून त्यांनी आग विझवली. प्रयत्नांची शिकस्त करून त्यांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि अपोेेलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्याच्या बॅगमध्ये काही प्रमाणपत्रे आणि मृत्यूचे कारण सांगणारे पत्र सापडले आहे.
त्या पत्रात त्याने म्हटले आहे की, तेलंगणाच्या प्रस्तावाला सरकार प्रतिसाद देत नाही म्हणून माझ्यासारख्यांना नोकऱ्या मिळत नाही. वेगळ्या तेलंगणात नव्या नोकऱ्या निर्माण होतील म्हणून या आंदोलनात मी माझ्या प्राणाची आहुती देत आहे. तेलंगणा वेगळे होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवा, असेही त्याने तेलुगूमध्ये लिहून ठेवले आहे.
आज उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह गावकऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला.
Monday 22 February, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment