Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 March, 2009

अमलीपदार्थांच्या मुद्यावरून सरकारला 'घरचा आहेर'

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : अमली पदार्थांचा गोव्यात मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरू असताना त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य सरकार ठोस पावले उचलत नसल्याचा घणाघाती आरोप सरत दोन सत्ताधारी सदस्यांनीच आज गोवा विधानसभेत सरकारच्या कार्यपध्दतीचे धिंडवडे काढले. माजी मंत्री व आमदार दयानंद नार्वेकर व आमदार आग्नेल फर्नांडीस यांनी आपल्याच सरकारवर तुफानी हल्ला चढवल्याचे पाहून सारे सभागृह आवाक झाले.
गोव्यातील अंमली पदार्थ व्यवहाराची गेल्या तीन वर्षांतील पोलिसांत नोंद झालेल्या प्रकरणांची माहिती नार्वेकर यांनी गृहमंत्र्याकडे एका तारांकित प्रश्नाव्दारे मागितली होती. २००७ साली २३, २००८ मध्ये २४ तर २००९ वर्षी आतापर्यंत ९ प्रकरणे नोंद झाल्याची माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी दिली होती. या तीन वर्षांची एकूण प्रकरणे जमेस धरल्यास ५६ पैकी केवळ सात प्रकरणात गोमंतकीय गुंतल्याचेही त्यांनी सांगितले होते.
गोव्यात मोठ्या प्रमाणात हा व्यवहार सुरू आहे. त्यात काही स्थानिकही गुंतले असून याची सखोल चौकशी करण्याची आग्रही मागणी नार्वेकर यांनी केली. गोव्यातील गुन्हेगारी ही विशेषतः या व्यवहारामुळेच होत असून त्यातून शांतताप्रिय गोव्याचे नाव बदनाम होत चालल्याचे सांगून या बाबत ठोस कारवाई करण्याबाबत सरकारची कोणतीच हालचाल दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.
मुबई पोलिसांनी या अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणात बांद्रा येथे एका तुकाराम साळगावकर नामक एका गोमंतकीयाला अटक केली आहे. तेथील पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने काही स्थानिकांची नावे उघड केल्याचा गौप्यस्फोट नार्वेकर यांनी केला व राज्य सरकार त्याची साधी चौकशीही का करत नाही असा संतप्त सवाल केला. मुंबई पोलिसांकडून त्याची माहिती घेऊन एव्हाना गोवा पोलिसांनी चौकशी करण्याची गरज होती असेही ते म्हणाले.
त्याचा कबुली जबाब मागवून पोलिसांनी कारवाई केली असती तर येथील व्यवहाराचे जाळे व त्यात गुंतलेल्या व्यक्तींचा शोध घेता आला असता. एका इस्त्रायली युवकाचे नाव त्यात आढळल्यावर त्याला १५१ कलमाखाली अटक करून सोडून दिल्याचे नार्वेकर म्हणाले. त्याला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली अटक का केले नाही असा प्रश्न त्यांनी गृहमंत्री नाईक यांनी केला. सत्ताधाऱ्यांकडून मिळालेल्या या घरच्या आहेरामुळे गृहमंत्री पार गोंधळून गेले व काय करावे तेच त्यांना सुचेनासे झाले.
मुंबई पोलिसांकडून याबाबतची माहिती मागवून चौकशी करणार का नाही असा संतप्त सवालही नार्वेकर यांनी केला. त्यावेळी गोवा पोलिस त्यांच्या संपर्कात असून आवश्यक ती माहिती घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगून गृहमंत्र्यांनी वेळ मारून नेली.
त्याआधी कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी या प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना कळंगुटसारख्या किनारी भागात अमली पदार्थांचा व्यवहार खुलेआम सुरू असल्याचे सांगत "सोनारानेच कान टोचावे' तशी सरकारची अवस्था करून टाकली. या व्यवहारात मोठ्या प्रमाणात नायजेरियन लोक गुंतले असून त्यांची चौकशी होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

No comments: