Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 24 March, 2009

...तर दक्षिण गोव्यात पाण्याची भीषण टंचाई, सांग्यातील खाणींवरून सरकारचे वाभाडे

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) : सांगे भागातील खाणींच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत आज जोरदार आवाज उठवत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना राज्याचे खाण धोरण जाहीर होईपर्यंत बंद असलेल्या कोणत्याही खाणीच्या परवान्याचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचे आश्वासन देण्यास भाग पाडले. तसेच खाण कंपन्यांच्या टाकाऊ मातीमुळे साळावली धरणाचा खोलपणा कमी होत चालला असून त्यामुळे भविष्यात दक्षिण गोव्यात पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
सांग्याचे आमदार वासुदेव गावकर यांनी सांगे भागात कार्यरत असलेल्या खाण उद्योगांची माहिती प्रश्नोत्तर तासाला विचारली होती. सांग्यात एकूण १६ खाणी असल्याचे उत्तर मुख्यमंत्री कामत यांनी दिले असता तेथे आणखीही बेकायदा खाणी सुरू असल्याचे गावकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
सध्या तेथे कार्यरत असलेल्या सोळा उद्योगांपैकी चौदा खाण उद्योग हे साळावली धरणाच्या एक किलोमीटर परिघात आहेत. शिवाय खाण कंपन्यांची टाकाऊ माती पावसाळ्यात वाहून साळावली धरणात येते. त्यामुळे या धरणाचा खोलपणा कमी होत चालल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. परिणामी आगामी काळात दक्षिण गोव्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सांग्यातील खाण कंपन्या दरवर्षी १५ लाख टन टाकाऊ माती तेथे टाकत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाय खाणीची माती पाण्यात मिसळल्यामुळे त्या पाण्याचा पिण्यासाठी होणारा वापर धोकादायक ठरत असून त्यातून मूत्रपिंड निकामी होण्यासारखे प्रकारही उद्भवण्याची भीती पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केली. खाण कंपन्यामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून साळावली धरण मुक्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज असल्याचे सांगून अन्यथा भविष्यात दक्षिण गोव्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
सभापती प्रतापसिंह राणे यांनीही या चर्चेदरम्यान सरकारचे कान उपटले. जर सांग्यात बेकायदा खाणी सुरू असतील तर तात्काळ खाण संचालकांना त्या बंद करण्याचे आदेश द्या, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.
दरम्यान, आमदार वासुदेव गावकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री कामत यांनी राज्याचे नवे खाण धोरण जाहीर करताना साळावली धरण परिसरातील खाण उद्योगांबाबत विरोधकांनी मांडलेल्या सूचना विचारात घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले. सध्या खाण धोरण मसुदा जनतेच्या सुचनांसाठी ठेवला तेव्हा सुमारे शंभर हरकती आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यात कालांतराने तेथील खाण उद्योग बंद करण्याची आवश्यकता असल्याचीही एक सूचना आल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
खाण उद्योगांसाठी होणाऱ्या वाहतुकीमुळेही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या कंपन्यांच्या बेदरकार वाहतुकीमुळे जनतेचा जीव धोक्यात आला असून नित्यनेमाने अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे गावकर यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिले. लोकांच्या जीवाला निर्माण झालेला हा धोका दूर करण्याच्या हेतूने उगे ते कापसे दरम्यान बगलमार्ग बांधण्याची मागणी केली आहे. सरकारने त्याचा गांभीयार्ंने विचार करावा अशी शिफारसही त्यांनी केली.

No comments: