Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 March, 2009

'ताळगाव बचाव मंच'कडून बाबूश गटास कडवे आव्हान

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : ताळगाव पंचायतक्षेत्रातील स्वाभिमानी मतदारांनी उद्या २२ रोजी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आपले अनमोल मत गुंडगिरी व दडपशाहीविरोधात वापरून आपली ताकद सिद्ध करावी,असे आवाहन "ताळगाव बचाव लोकशाही मंच'तर्फे करण्यात आले आहे.
ताळगावचे भवितव्य अबाधित राहायचे असेल ही संधी अजिबात वाया घालवता कामा नये त्यासाठी प्रत्येक ताळगाववासियाने आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदानातून क्रांतिकारक कौल द्यावा,असेही आवाहन या गटाचे नेते आग्नेल सिल्वेरा व ताळगाव बचाव लोकशाही मंचचे निमंत्रक झेवियर आल्मेदा यांनी केले आहे.
ताळगाव पंचायतीची निवडणूक उद्या २२ रोजी होणार असून एकूण ११ पैकी दहा प्रभागांत मतदान होणार आहे. प्रभाग १ मध्ये रोझारीयो मास्कारेन्हास यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित १० प्रभागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. ताळगाव पंचायत क्षेत्रात एकूण १४०९८ मतदारसंख्या असून त्यात ८०१३ पुरुष व ७७४६ महिला मतदारांचा समावेश आहे. ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पुरस्कृत केलेला गट व ताळगाव बचाव लोकशाही मंच यांच्यातच दुरंगी लढत होणार असल्याने अनेकांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. ताळगाव बचाव लोकशाही मंचाला भाजपचा पाठींबा मिळाल्याने बाबूश गटासमोर जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे. ताळगावचे सम्राट अशी ओळख निर्माण करून या पंचायतक्षेत्रावर आपले निर्विवाद वर्चस्व प्राप्त करण्याचा उद्देशाने संपूर्ण पॅनेल बिनविरोध निवडून आणण्याचा घाट बाबुश यांनी घातला असता "ताळगाव बचाव लोकशाही मंचामुळे तो अपयशी ठरला आहे.
ताळगावात सुरू असलेली गुंडगिरी व दडपशाही याला चोख प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने पुढे सरसावलेल्या ताळगाव बचाव लोकशाही मंचाच्या धाडसी उमेदवारांना येथील मतदार कितपत पाठिंबा देतात हेच या मतदानाव्दारे सिद्ध होणार आहे. या निवडणूकीव्दारे ताळगावच्या भवितव्याचा निकालच लागणार असल्याने मंचतर्फे बाबूश यांना टक्कर देण्यासाठी जबरदस्त तयारी चालवली आहे.
बाबूश यांना या पंचायतक्षेत्रात विरोध करण्याचे धाडस कुणाच्यातच नाही, ही आतापर्यंतची समजूत या निवडणुकीत मात्र पूर्णपणे फोल ठरली आहे. "ताळगाव बचाव लोकशाही मंच'या झेंड्याखाली या भागातील काही विचारवंत व सज्ञान लोक एकत्र आले असून ते इतर मतदारांची कितपत समजूत काढण्यात यशस्वी ठरतात त्यावरच त्यांचे यश अवलंबून आहे.
ताळगाव पंचायतीत स्थलांतरितांचा आकडा इतर मतदारसंघापेक्षा जास्त आहे. बाबूश मोन्सेरात यांची ही "वोटबॅंक' असून त्यांच्या बळावरच तेथे सत्ता अबाधित ठेवण्यात ते यशस्वी होतात,अशी माहिती येथील काही स्थानिकांनी दिली. दरम्यान, ताळगावात सुशिक्षित व सज्ञान नागरिक असले तरी त्यांच्याकडून मात्र उघडपणे भूमिका घेतली जात नाही. या भागांत गुंडगिरी व दडपशाहीचे पेव फुटले आहे. विविध गुन्हेगारी प्रकरणांत गुंतलेले लोक उजळ माथ्याने फिरत असून राजकीय दबावाखाली पोलिसही त्यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याने येथील सामान्य लोक अगतिक बनले आहेत. "मनी व मसल' पॉवरच्या जोरावर येथील राजकीय सूत्रे आपल्या हाती ठेवण्याची पद्धत रूढ बनल्याने येथील सुज्ञ नागरिक कायम दहशतीखाली वावरत आहेत. "ताळगाव बचाव लोकशाही मंचा" मुळे त्यांना एक चांगला पर्याय मिळाला आहे. गुंडगिरी व दडपशाहीसमोर नमते घेऊन हार मानण्याइतपत ताळगावातील लोक लेचेपेचे नसून या निवडणुकीत या गटाचे किमान तीन ते चार सदस्य अवश्य निवडून येतील,असा आत्मविश्वास ताळगाव बचाव गटाने व्यक्त केला आहे. दरम्यान,ताळगाव बचाव लोकशाही आघाडी मंचतर्फे निवडणूक रिंगणात असलेल्यांत नसरीन पटेल(प्रभाग-२),सेबी डिसोझा(प्रभाग-३),मिलन शिरवयकर(प्रभाग-४),वामन मुरगांवकर(प्रभाग-५),ऍनाबेला परेरा(प्रभाग-६),नानी दिवकर(प्रभाग-७),झाकारीस मोन्तेरो(प्रभाग-८),जेनिफर मास्कारेन्हास(प्रभाग-९),संजू नाईक(प्रभाग-१०)व कॅनडिडो डायस(प्रभाग-११) यांचा समावेश आहे.
----------------------------------------------------------------
पंचायतीसाठी आज मतदान
ताळगाव पंचायतीचा पाच वर्षांचा कार्यकाळ २४ रोजी संपुष्टात येणार आहे. मतदान आज २२ रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत होणार असून सोमवारी २३ रोजी मतमोजणी सकाळी ८ वाजल्यापासून मिनेझीस ब्रागांझा सभागृहात होणार आहे.

No comments: