Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 24 March, 2009

धरणे, मोर्चांनी राजधानी दणाणली! सार्वत्रिक असंतोषाचे दर्शन

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विविध सामाजिक तथा खुद्द सरकारी पातळीवरील संघटनांकडून आज सरकारचा निषेध करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार हे पूर्णपणे निष्क्रिय बनले असून हे सरकार जनतेसाठी नसून केवळ काही ठरावीक लोकांसाठीच असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आज सकाळी येथील जुन्ता भवनसमोर गाव घर राखण मंचतर्फे पंचायत संचालनालयावर मोर्चा आणण्यात आला. पंचायतमंत्री बाबु आजगांवकर यांनी पंचायतीराज कायद्यात दुरुस्ती करून पंचायत मंडळाच्या हक्कांवर गदा आणून सर्व ताबा सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात देण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.एकीकडे पंचायतीराज कायद्याचे गोडवे गाणे तर दुसरीकडे पंचायत मंडळांचे हक्क हिरावून घेणे ही नीती लोकशाहीसाठी मारक असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. या मोर्चात विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात प्रजल साखरदांडे,फादर मेवरीक फर्नांडिस,प्रवीण सबनीस आदींचा समावेश होता. सिदाद प्रकरणी सरकारने जारी केलेल्या वटहुकमाचाही यावेळी निषेध करण्यात आला.प्रादेशिक आराखडा २०२१, बाह्य विकास आराखडे तसेच मेगा प्रकल्पांबाबत सरकारच्या कृतीबाबत यावेळी संशय व्यक्त करण्यात आला.
दुसरीकडे उत्तर गोवा बस मालक संघटनेच्यावतीने वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांना तात्काळ बडतर्फ करण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.अशोक भोसले यांच्या विरोधात सर्व पुरावे सादर करूनही सरकारकडून त्यांना अभय देण्यात येत असल्याचा आरोप संघटनेचे नेते सुदीप कळंगुटकर व जय दामोदर संघटनेचे नेते महेश नायक यांनी केला.
सरकारी कर्मचाऱ्यांचे धरणे
केवळ निमसरकारीच नव्हे तर सरकारी पातळीवरही सरकारच्या कार्यपद्धतीबाबत असंतोष पसरला आहे याचे दर्शन आज अखिल गोवा सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमातून घडले. विविध सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सेवावाढी विरोधात आज सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे निषेध धरणे बंदर कप्तान कार्यालयासमोर धरण्यात आले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हा विषय हाताळण्याचे आश्वासन देऊनही आपल्या शब्दाला ते जागले नाहीत,असेही त्यांनी सांगितले. खुद्द मुख्यमंत्री स्वतः याविरोधात असताना ते काहीही करू शकत नाहीत यावरून त्यांची अगतिकता स्पष्ट होते,अशी टीका यावेळी करण्यात आली.

No comments: