Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 March, 2009

कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मनमोहनसिंगच

नवी दिल्ली, दि. २४ : युवकांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी व ग्रामीण भागावर अधिक लक्ष्य देण्याचे अभिवचन आज येथे जारी करण्यात आलेल्या कॉंगे्रस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. आज येथे एका समारंभात हा जाहीरनामा घोषित करण्यात आला. यावेळी बोलताना कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले की, डॉ. मनमोहनसिंग हेच कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. मनमोहनसिंग यांच्याकडे अनुभव आहे व त्यांच्याइतका दुसरा तुल्यबळ उमेदवार पक्षाकडे नाही, असे सांगून कॉंगे्रस पक्षाच्या जाहीरनाम्याची पुस्तिका जाहीर केली. त्यावरील पंतप्रधानांच्या छायाचित्राकडे बोट दाखवून मनमोहनसिंग हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असून त्यांना आमचा पाठिंबा आहे, असे दर्शविले.
२००४ साली आम्ही जनतेला जी वचने दिली होती त्यापैकी बहुतांश वचनांची आम्ही पूर्तता केली आहे, असे सांगून सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेला कॉंग्रेस हाच एक पक्ष आहे. जाहीरनामा व केलेली कामे याकडे बघता कॉंगे्रस व इतर राजकीय पक्षांमधील फरक सहज लक्षात येतो, असेही गांधी म्हणाल्या.
पंतप्रधान मनमोहनसिंग यांची स्तुती करताना सोनिया म्हणाल्या, त्यांच्याजवळ अनुभव आहे तसेच देशाला नेतृत्व देण्याची क्षमता आहे व ती त्यांनी सिध्दही करून दाखविली आहे. मनमोहनसिंग यांच्यासमोर पंतप्रधान म्हणून दुसरी कोणतीही व्यक्ती उभी राहू शकत नाही.
देशातील नागरिकांची सुरक्षितता व प्रगती हेच कॉंगे्रस सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे सोनिया गांधी यांनी जाहीरनामा प्रसिध्द केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जागतिक मंदीच्या काळात विकासचा दर राखला जाईल व शेतकऱ्यांवर मंदीचा कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी कॉंग्रेस घेईल, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकांना आवाहन केले की त्यांनी कॉंगे्रसला मतदान करावे. देशाने कोणत्या मार्गाने जावे, हे ठरविण्याची संधी जनतेला प्राप्त झाली आहे. कॉंगे्रस पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रातील संपुआ सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेत मनमोेहनसिंग पुढे म्हणाले की, देशाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागला असला तरी आर्थिक विकासाच्या बाबतीत चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विकासाचा हा दर कायम राखण्यासाठी जनतेने पुन्हा कॉंगे्रसला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या अणुकरारावर मनमोहनसिंग यांनी यावेळी आपलीच पाठ थोपटून घेतली. या कराराला भाजपा व डाव्या पक्षांनी जो विरोध दर्शविला त्याकडेही लक्ष वेधत या पक्षांवर टीका केली. पिलीभीत मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार असलेल्या वरुण गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर त्यांनी यावेळी टीका केली. डाव्यांवर प्रहार करताना मनमोहनसिंग म्हणाले, या पक्षांची भूमिका सदैव नकारात्मकच राहात आलेली आहे. त्यामुळे ते देशाला कधीच पुढे घेऊन जाऊ शकणार नाही.
कॉंगे्रस अध्यक्ष व संपुआच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी जी कामगिरी बजावली आहे ती उल्लेखनीय आहे, असे म्हणत त्यांनी सोनियाजींवर यावेळी स्तुतिसुमने उधळली. २००४ मध्ये कॉंगे्रस पक्षाने जनतेला दिलेली अभिवचने तसेच किमान समान कार्यक्रमात दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न केले याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुंबईवरील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला. मुंबईवरील हल्ल्यातील आरोपींना पाकिस्तानने पकडून त्यांना शिक्षा द्यावी, असे म्हटले.
पंतप्रधान बनणार नाही : सोनिया
पक्षाचा पंतप्रधान बनण्याची शक्यता कॉंग्र्र्र्र्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा फेटाळून लावत म्हटले आहे की, २००४ साली यासंदर्भात जी भूमिका घेतली होती त्यात कोणताही बदल होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आपण स्वत:ला पंतप्रधानपदासाठी सक्षम समजता का, असे विचारले असता सोनियाजी बोलत होत्या.
पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असे पत्रकारांनी विचारले असता, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या जाहीरनाम्याची पत्रिका हाती घेऊन त्यावरील पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या छायाचित्राकडे बोट करून व पत्रिकेच्या मागे आपला हात ठेवून हेच दर्शविले की मनमोहनसिंग हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असून त्यांना आमचा पाठिंबा आहे.

No comments: