Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 March, 2009

मनमोहनसिंग यांनी काढला अडवाणी यांच्यावर राग

नवी दिल्ली, दि. २४ : बाबरी मशिदीचा विध्वंस आणि गुजरात दंगलींमध्ये प्रमुख भूमिका पार पाडणारे, संसदेवर व लाल किल्ल्यावर अतिरेकी हल्ला झाला तेव्हाही गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार नसल्याची टीका पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी अनेकदा मनमोहनसिंग यांना "कमजोर' पंतप्रधान संबोधले होते. त्याचा राग आज मनमोहन सिंग यांनी अडवाणी यांना अयोग्य ठरवून काढला. एवढेच नव्हे तर, अडवाणी यांनी देशाच्या कल्याणासाठी काय केलेे, असा प्रश्नही विद्यमान पंतप्रधानांनी उपस्थित केला. अडवाणी देशाचे नेतृत्व करतील की नाही, हे या निवडणुकीनंतरच निश्चित होईल, असेही ते म्हणाले.
चार वषार्र्पूर्वी अडवाणी पाकिस्तान दौऱ्यावर गेले असताना त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे कौतुक केले होते, ते एक संधीसाधू नेते आहेत, असा आरोपही डॉ. सिंग यांनी केला. कॉंग्रेस पक्षाचे घोषणापत्र आज जाहीर करण्यात आले, त्याप्रसंगी पंतप्रधान पत्रकारांसोबत बोलत होते.
मी कमजोर पंतप्रधान आहे की मजबूत, हे आमच्या सरकारच्या कामावरूनच स्पष्ट होते, असेही मनमोहन सिंग म्हणाले.
अडवाणी माझ्यावर वारंवार कमजोर पंतप्रधान म्हणून ठपका ठेवत असतात. मात्र, सर्वांनाच माहिती आहे की, बाबरी मशीद विध्वंसामध्ये त्यांची प्रमुख भूमिका आहे, तसेच रालोआ सरकारच्या कार्यकाळातच संसदेवर व लाल किल्ल्यावर अतिरेकी हल्ला झाला होता आणि अतिरेक्यांनी इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचे अपहरण केले होते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

No comments: