Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 22 March, 2009

दहशतवादाला पाकचे अभय नाही : शाहिद मलिक

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): भारत व पाकिस्तान दरम्यान शासकीय, सामाजिक आणि राजकीय पातळीवर सामंजस्य व विश्वास वाढीला लागणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त शाहिद मलिक यांनी आज दोनापावल येथे केले. गोवा सरकारच्या "एनआरआय - व्यवहार' विभागाचे आयुक्त एदुआर्द फालेरो यांच्यातर्फे दोनापावल येथे आयोजित "पत्रकारांसोबत गप्पा' कार्यक्रमात ते बोलत होते. भारताप्रमाणे पाकिस्तानही दहशतवादाचा बळी ठरला असल्याने दहशतवाद किंवा दहशतवादी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न पाककडून होणे शक्यच नाही, अशी ग्वाही उच्चायुक्त श्री. मलिक यांनी दिली.
भारत व पाकिस्तान या उभय देशांमध्ये अनेक गोष्टींवरून गैरसमज आहेत. ते दूर होऊन उभयतांत सर्वच पातळ्यांवर सामंजस्य निर्माण होण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या स्वात प्रांतात आम्ही तालिबानशी जुळवून घेत आहोत हा अपप्रचाराचा भाग असून युध्दबंदी करणे म्हणजे जुळवून घेणे असे होत नसल्याचे ते म्हणाले.
तालिबान ही दहशतवादी संघटना आहे याबद्दल कोणाचेही दुमत नाही. मात्र शांतता नांदणे हे आमच्यादृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे. अशावेळी स्वात प्रांतात शांतता प्रस्थापित करण्यासाठी युध्दबंदी करार करण्यात गैर ते काय, असा उलट सवाल त्यांनी केला. तालिबान हा तालिबान आहे. चांगला तालिबान, वाईट तालिबान असा प्रकार नसतो. दहशतवादाशी कठोर मुकाबला करण्यास पाकिस्तान वचनबध्द असून दहशतवादाशी लढणे आमचे कर्तव्यच असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
२६ नोव्हेंबर २००८ रोजीच्या मुंबई हल्ल्याचा तपास सुरू असून या कामी उभयपक्षी सहकार्य सुरू आहे. भारताने सादर केलेले पुरावे आणि माहिती तसेच पाकने दिलेले सहकार्य यामुळे चौकशीचे काम अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाकमध्ये अलीकडेच झालेल्या राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी नव्हत्या तर काही लोक ठरावीक मागण्या घेऊन आंदोलन करत होते. या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र केवळ तेवढ्यावरून पाकमध्ये राजकीय उलथापालथ झाली असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दहशतवादाविरोधात पाकने चालविलेल्या प्रयत्नांना भारताकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
श्रीयुत यांच्यावर पत्रकारांनी याप्रसंगी खोचक आणि अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांचा अक्षरशः भडिमार केला, मात्र अडचणीत आणणाऱ्या या प्रश्नांमुळे पाहुण्याची उडणारी तारांबळ थांवण्यासाठी श्री. फालेरो यांना हस्तक्षेप करत वातावरणातील ताण हलका करावा लागला. प्रश्नांच्या भडिमारामुळे अस्वस्थ झालेले उच्चायुक्तांनी उभय देशांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे अधिक गरजेचे असल्याचे यावेळी वारंवार सांगितले.
श्री. फालेरो उच्चायुक्तांचे स्वागत करताना, भारत व पाकदरम्यान सौदर्हाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. उभय देशांतील संबंध सध्या राजकीय वावटळीत सापडले असून वादग्रस्त मुद्यांमुळे ते ताणले गेले आहेत. तथापि, हे संबंध सुघारणे दोन्ही देशांच्या तसेच दक्षिणपूर्व आशियातील अन्य देशांच्या हिताच्या दृष्टीने सुधारणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
भारतासाठी "मोस्ट वॉंटेड' असलेला कुख्यात गुंड (दहशतवादी) दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानात नसल्याचा दावा श्री. मलिक यांनी केला."दाऊद पाकिस्तानात नाही' असे त्रस्त आवाजात त्यांनी सांगितले.

No comments: