Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 24 March, 2009

'वरूणच भाजपचा उमेदवार' सल्ला देण्याचा आयोगाला अधिकार नाही : जेटली

नवी दिल्ली, दि. २३ : लोकसभा निवडणूक लढविण्यापासून वरुण गांधी यांना रोखण्यासाठी भाजपला सल्ला देण्याचा निवडणूक आयोगाला कोणताही वैधानिक अधिकार नसून असे करण्यापेक्षा त्यांनी राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना रोखावे, असा टोला भाजपाचे महासचिव अरुण जेटली यांनी मारला आहे. याच दरम्यान मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी वरूण गांधी हेच भाजपचे पिलभीत मतदारसंघातील उमेदवार असतील, असे स्पष्ट केले.
आज पत्रकारांशी बोलताना जेटली म्हणाले की, पक्षाने कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला देऊ नये, हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या कक्षेतील नाही. उमेदवारावर निवडणूक लढविण्याची बंदी आणि अपात्रता याचे निकष कायद्याच्या कलम १०२ मध्ये स्पष्ट निर्दिष्ट आहेत. अजूनही वरुणच्या विरोधात आरोपपत्र दाखल झालेले नाही. निवडणूक आयोगाला जे करण्याचा प्रत्यक्षात अधिकार नाही त्यांनी त्या सर्व गोष्टी अप्रत्यक्षरित्या करू नये. यापेक्षा आयोगाने टाडा, कलम ३०२ दाखल असणाऱ्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यापासून रोखले पाहिजे. समाजवादी पार्टीने लखनौतून संजय दत्तला उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरुद्ध टाटा कोर्टात खटला सुरू आहे. आता हे सर्व गुन्हेगार आपल्याला निवडणूक लढविण्याची परवानगी मिळावी म्हणून धडपडत आहेत. अनेकांनी न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
एखाद्या उमेदवाराच्या भाषणावर आक्षेप घेण्याचा, त्यातील आक्षेपार्ह बाबींची नोंद घेऊन त्याविषयी संबंधित उमेदवार किंवा पक्षाला खडसाविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार निश्चितपणे आहे. पण, कोण उमेदवार असावा आणि कोणत्या पक्षाचा असावा, हा आयोगाच्या अधिकाराचा प्रांत नाही, असेही जेटली म्हणाले.
वरुण गांधी यांच्यावर टीका न करता जेटली म्हणाले की, आम्ही पक्षातील सर्व उमेदवारांना आचारसंहितेचे सक्तीने पालन करण्याची ताकीद दिली आहे.

No comments: