Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 March, 2009

गोमंतकीय साहित्यात सातोस्कर महान शक्ती - डॉ. भेंडे

बा. द. सातोस्कर जन्मशताब्दी सांगता समारंभ

पणजी, दि.२६ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - आयुष्याच्या अंतापर्यंत बा.द. सातोस्कर(दादा) यांनी आपली लेखणी चालूच ठेवून कोऱ्या कागदाच्या हाकेला ओ दिला. दादांचा हात नेहमी लिहिता राहिला. गोमंतकीय साहित्यात दादा म्हणजे एक महान शक्ती होते, असे उद्गार प्रसिद्ध लेखक डॉ. सुभाष भेंडे यांनी काढले. कला आणि सांस्कृतिक संचालनालयाने आयोजित केलेल्या कै. बा. द. सातोस्कर ऊर्फ दादा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभाच्या उद्घाटनाच्या सत्रात प्रमुख पाहुणे डॉ. भेंडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर ज्येष्ठ प्रकाशक शरद गोगटे, बा. द. सातोस्करांचे सुपुत्र सचिंद्र सातोस्कर उपस्थित होते.
यावेळी पुढे डॉ. भेंडे म्हणाले की, सातोस्करांसारख्या महान लेखकाच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात सहभागी होणे हा आपल्या आयुष्यातील उत्तम भाग्ययोग होय. गोमंतकातील पहिल्या वृत्तपत्राचे पहिले संपादकपद साडेचार वर्षे त्यांनी भूषवले. तसेच गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या अध्यक्षपदावरून बोलणारे सातोस्कर हे त्यावेळच्या नवोदित लेखकांचे प्ररेणास्त्रोत होते. दादांनी अनेक तरुणांना लिहिते केले.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून सातोस्करांच्या तसबिरीला पुष्प अर्पण करण्यात आले. २०८ पानांच्या कै. बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन डॉ. भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या ग्रंथाचे संपादक प्रा. रवींद्र घवी, मुखपृष्ठ चित्रकार कीर्तीकुमार प्रभू, देविदास भट, गुरुनाथ सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी शरद गोगटे यांनी बोलताना सांगितले की, निसर्गरम्य गोव्यात आपण प्रथम आलो तो सातोस्कर यांच्यामुळेच. १९७५ साली त्यांचा ग्रंथ प्रकाशित करण्याचे भाग्य आपल्याला लाभले. त्यानंतर आम्ही चांगले स्नेही बनलो.सातोस्कर हे प्रकाशकही होते. १९३१ साली त्यांनी प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करून सागराच्या लाटा हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. सातोस्कर हे नेहमी प्रकाशक हा थोडा तरी लेखक असावा असे म्हणायचे, असेही यावेळी गोगटे यांनी सांगितले.
उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले. कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांना स्मृतिचिन्हे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात, "बा. द. सातोस्कर ः व्यक्तिमत्त्व व कार्य' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. त्यात अध्यक्षस्थानी प्रा. रवींद्र घवी, तर परिसंवादात दै. नवप्रभाचे निवृत्त संपादक सुरेश वाळवे, डॉ. सोमनाथ कोमरपंत, स्वातंत्र्यसैनिक रमेश होडारकर यांनी भाग घेतला.
यावेळी बोलताना डॉ. कोमरपंत यांनी सांगितले की, वाङ्मयनिर्मिती हाच सातोस्करांचा श्वास आणि ध्यास होता. जाज्वल्य मनोवृत्ती व असीम निष्ठेने त्यांनी शारदेची अखंड उपासना केली. गोमंतकाच्या नवनिर्माण प्रक्रियेत त्यांचा मौलिक वाटा आहे. हे व्यासपीठ निरंतर वर्धिष्णू कसे राहील याची त्यांनी काळजी घेतली. सागर साहित्य प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन करून त्यांनी गोमंतकातील व मराठीच्या मुख्य धारेतील लेखक कवींची पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली. रामायण आणि महाभारत हे दादांचे अखंड चिंतनाचे विषय होते. ही दोन महाकाव्ये कादंबरीच्या रूपात करताना मराठी कादंबरीचे अनुभवक्षेत्र त्यांनी वाढवले. सृजनशील साहित्य निर्मितीबरोबरच त्यांनी समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखन केले. "गोमंतक ः प्रकृती आणि संस्कृती' हा त्यांनी लिहिलेला संशोधन ग्रंथ म्हणजे त्यांच्या संशोधन कार्याचा कलशाध्याय असल्याचे डॉ. कोमरपंत यांनी शेवटी सांगितले.
यानंतर सुरेश वाळवे यांनी पत्रकार सातोस्कर या विषयावर बोलताना, दादासाहेब हे गोमंतक मराठी पत्रकारितेचे भीष्माचार्य होते. त्यांची लेखणी विधायक होती, असे सांगितले. यावेळी सातोस्करांचे स्नेही होडारकर यांनीही आपले विचार मांडले.
अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. घवी म्हणाले की, आज लोकांची साहित्याकडे बघण्याची वृत्ती कमी झालेली आहे. पण साहित्याला पुनर्जन्म देण्याचे कार्य दादासाहेबांनी केले होते. माणसाचे दोष माणसासोबत जातात पण त्यांनी केलेले कार्य मागे राहते. दादासाहेब हे संस्थात्मक कार्य करणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेक साहित्य संमेलने घडवून आणली. आजच्या साहित्य संमेलनाची स्थिती वेगळी असल्याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले.
यावेळी कुलदीप कामत यांनी सूत्रसंचालन केले.
त्यानंतर विश्रांतीनंतर दुसऱ्या सत्रात "गोमंतकीय पत्रकारिता ः काल, आज आणि उद्या' या विषयावर सीताराम टेंगसे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. या परिसंवादात दै. गोमंतकचे निवासी संपादक संजय ढवळीकर, दै. पुढारीचे गोवा आवृत्ती प्रमुख प्रभाकर ढगे, दै. नवप्रभाचे कार्यकारी संपादक परेश प्रभू यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन लीना पेडणेकर यांनी केले. त्यानंतरच्या समारोप सोहळा रामकृष्ण नायक यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी शारदीय प्रकाशन गोवा यांच्या तर्फे बा. द. सातोस्कर यांच्या "गोमंतक प्रकृती आणि संस्कृती' या खंडाचे प्रकाशन श्री. नायक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सातोस्कर यांचे पुत्र सचिंद्र सातोस्कर व महेश आंगले हजर होते. अशोक परब यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अजय वैद्य यांनी केले.

No comments: