Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 13 June, 2008

अखेर 'अंधेरी नगरी' हटवले..!

जहाज मालकावरील कारवाईबाबत म्हणे 'अभ्यास' सुरू
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) : अखेर तब्बल १४ दिवसांनी आज (शुक्रवारी) "अंधेरी नगरी' हे ट्रान्सशिप सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान करंझाळे किनाऱ्यावरून दोरखंडाच्या साहाय्याने हटवण्यात आले. मात्र, हे जहाज तेथे रुतण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार हे सरकारने गुलदस्त्यातच ठेवले आहे. त्याबाबतचा अभ्यास सुरू असल्याची माहिती
कॅप्टन ऑफ पोर्टसचे कॅप्टन ए. पी. मास्करेन्हास यांनी दिली.
करंझाळे किनाऱ्यावर बेकायदा तळ ठोकून असलेल्या या महाकाय जहाजाने त्यानंतर जयगड बंदरावर जाण्यासाठी प्रयाण केले. गेल्या दोन दिवसांपासून हे जहाज तेथून हटवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र प्रचंड लाटांमुळे जहाज हटवणे कठीण बनले होते. त्यातच जहाजाला दोरखंड बांधून ते ट्रॉलरद्वारे खेचण्यात येत असल्याने अनेकदा त्याचा दोरखंडही तुटला होता. मात्र आज दोरखंडानेच या प्रयत्नांना साथ दिल्यामुळे जहाज तेथून हलले व "जयगड' बंदरावर जाण्यासाठी रवाना झाले.
गेल्या दोन दिवसापूर्वी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी १८ जून हे जहाज न हटवले गेल्यास त्याच्या जप्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर पर्यावरण मंत्री ऍलेक्स सिक्वेरा यांनी तीन दिवसात जहाज हटवण्याचा इशारा दिला होता. तसेच "गोयच्या रापणकारांचो एकवट' या संघटनेने या जहाजामुळे मच्छीमार बांधवांना नुकसान झाले असल्याने भरपाईची मागणी केली आहे. तसेच कोणत्याही सरकारी यंत्रणेची परवानगी न घेता हे जहाज किनाऱ्यावर नांगरून ठेवल्याने जहाजाच्या मालकाला अटक करण्याची मागणी केली होती.

No comments: