Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 9 June, 2008

जमीर यांना परत बोलावण्याची राष्ट्रपतींकडे भाजपची मागणी

दोन लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर
नवी दिल्ली, दि.९ : अतिशय उर्मटपणे वागणारे आणि पक्षपात करणारे गोव्याचे राज्यपाल एस. सी. जमीर यांच्याविरोधात भाजपाने आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. गोव्यातील दोन लाख नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन घेऊन भाजपचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या दरबारी गेले.
राज्यपाल जमीर यांचा पक्षपाती व्यवहार गोव्यातील बहुतांश जनतेला मान्य नाही. त्यांना केंद्राने तात्काळ परत बोलवायला हवे, असे मत असलेल्या दोन लाख गोवेकरांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील भाजप शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना सोपविले.
तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याने आणि तीन आमदारांनी पाठिंबा काढल्याने गोव्यातील कॉंगे्रसचे सरकार अल्पमतात आल्यानंतर राज्यपालांनी हे सरकार वाचविण्यासाठी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित केले होते. त्यांचा हा निर्णय पक्षपाती होता, असे नमूद करताना पर्रीकर यांनी राष्ट्रपतींना सांगितले की, आपण या संपूर्ण प्रकरणाचा काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि राज्याच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा. राज्यपालपदाची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर जमीर यांना राज्यपालपदावरून हटविणे आवश्यक आहे. यावेळी माजी आमदार सदानंद तानावडे, सुभाष साळकर व गोविंद पर्वतकर तसेच गोवा भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रूडी हे उपस्थित होते.

No comments: