आता श्री श्री रवीशंकर मध्यस्थी करणार
जयपूर, दि.१० : गुज्जर आरक्षण आंदोलकांसोबत सोमवारी भरतपूर जिल्ह्यातील बयाणा येथे झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर आता चर्चेची दुसरी फेरी जयपूर येथे होणार असली तरी या दुसऱ्या फेरीच्या चर्चेबाबतचा गुंता अजूनही कायमच आहे. आणखी दोन मागण्या पुढे करण्यात आल्यामुळे ही गुंतागुंत निर्माण झाली आहे. एकीकडे गुज्जर नेते कर्नल किरोडीसिंग बैंसला यांनी राज्य सरकारला पत्र पाठवून आंदोलनासंबंधी काही मुद्दे सोडविण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारने आज बैंसला यांना पत्र पाठवून चर्चेसाठी जयपूरचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, आध्यात्मिक गुरू श्री श्री श्रीरवीशंकर यांनी याप्रकरणी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे.
काल बयाणाला गेलेले खनिकर्म विभागाचे मंत्री लक्ष्मीनारायण दवे आणि जलसंसाधन मंत्री सांवरलाल जाट यांच्याकडून सोमवारच्या चर्चेची माहिती घेतल्यानंतर राज्य सरकारने आज बैंसला यांना पत्र पाठवून जयपूरचे निमंत्रण दिले आणि पुढील बैठकीसाठी गुज्जर समाजाच्या प्रतिनिधींची नावे पाठविण्याची विनंती केली आहे. बैंसला यांनी पाठविलेल्या पत्रातील मुद्यांचाही येत्या बैठकीत विचार केला जाईल, असेही सरकारच्या या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महिला आंदोलकांची मुक्तता करावी आणि २० आंदोलनकर्त्यांवर लावण्यात आलेला हत्येचा गुन्हा मागे घेेण्यात यावा, या दोन प्रमुख मागण्याही कर्नल बैंसला यांनी पुढे केल्या असून या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या नवीन दोन मागण्यांमुळे पुढील चर्चेची गुंतागुंत वाढली असली तरी पुढील चर्चेसाठी बैंसला यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एका अधिकृत सूत्राने सांगितले.
Tuesday 10 June, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment