Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 June, 2008

कामत सरकार आणखी सत्तेवर राहिल्यास गोव्याचा सर्वनाश - पर्रीकर

मडगाव, दि. 8 (प्रतिनिधी) - लोकसंपर्क ही जमेची एकमेव बाजू सोडली तर दिगंबर कामत सरकारला गेल्या वर्षभरात साऱ्या आघाड्यांवर अपयश आलेले असून सरकार म्हणजे एक तमाशा ठरलेला आहे. राज्याची आर्थिक स्थिती , प्रशासन आदीचा बट्ट्याबोळ झालेला आहे व लोकजीवन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असा आरोप आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे केला व हे सरकार असेच सत्तेवर राहिले तर गोव्याचा सर्वनाश अटळ आहे, असा इशारा दिला.
आज येथे भाजपच्या दक्षिण गोवा जिल्हा कार्यकारिणी व सदस्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यावर पत्रकारांशी बोलताना पर्रीकर म्हणाले की , गोव्याचा हा विनाश टाळणे जनतेच्या, आमदारांच्या हातात आहे, त्यासाठी काय करायचे याचा विचार तिने, आमदारांनी करायला हवा.
या सरकारचा गेल्या वर्षभराचा आलेख नकारात्मक आहे. सेझ, कॅसिनेा ,कायदा व सुव्यवस्था आदींची उदाहरणे घेतली तर प्रत्येक ठिकाणी सरकारचे अपयशच दृष्टीस पडते. असे सांगून, या संदर्भात इकॉनॉमिक टाईम्सने काढलेल्या "वृत्तपत्रीय घोषणा'खेरीज सरकार दुसरे काहीच करू शकलेले नाही हे निष्कर्षाचे उदाहरण पर्रीकर यांनी दिले व परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत त्यामागील कारण अस्थिरता आहे, असे ते म्हणाले.
सरकार न्यायालयासमोर आता उलटसुलट प्रतिज्ञापत्रे देऊ लागले आहे व त्यामुळे एक दिवस येथील लोक अडचणीत येण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. कॅसिनोचे उदाहरण देऊन पर्रीकर म्हणाले, की कॅसिनो हे प्रतापसिंह राणेचे अपत्य आहे व जुगारप्रतिबंधक कायद्यात साधे एक कलम घालून कॅसिनोंवर निर्बंध आणता येण्यासारखा आहे पण सरकारची ती तयारी दिसत नाही. यासाठी आपण पावसाळी अधिवेशनात ही खासगी दुरुस्ती मांडणार आहे.या पूर्वीच आपण ते जाहीर केल्याचे ते म्हणाले . सरकारने या संदर्भात विधेयक आणल्यास भाजप त्याला पाठिंबा देईल असे त्यांनी जाहीर केले.
कायदा सुव्यवस्था या वर्षभरात ढासळल्याचा आरोप करताना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून 100 मी.च्या परिसरात एक दोन नव्हे तर तब्बल 15 दुकाने लागोपाठ फोडली जातात हाच त्याचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. निरुक्ता शेवडेकर, स्कार्लेट यांच्या मृत्युप्रकरणी सरकार पुरते उघडे पडल्याचा ठपका त्यांनी ठेवला व म्हटले की तोंडी घोषणांनी भागणार नाही तर प्रत्यक्ष कारवाई हवी, ती दिसायला हवी.
सरकारला त्यांनी " रिकाम्या भांड्याला आवाज जास्त' या म्हणीची उपमा दिली व म्हटले की त्याने राज्याला विनाशाच्या खाई पलीकडे नेण्याखेरीज दुसरे काहीच केलेले नाही व त्याचे प्रत्यंतर नजीकच्या भविष्यात येईल. अशा परिस्थितीत भाजपची भूमिका काय असेल असे विचारता ते उत्तरले की सरकार आपल्या कर्माने कोसळेल. त्यासाठी भाजपने पुढाकार घेण्याची गरज नाही की भाजप तशी भूमिकाही घेणार नाही. पण सरकारविरुद्ध अविश्र्वास ठराव आला तर त्याला पाठिंबा देईल.त्यानंतर काय ते त्यावेळची परिस्थिती पाहून ठरविले जाईल असे सूचक भाष्य त्यांनी केले.
ते म्हणाले की गोव्याच्या भवितव्याची काळजी असलेले भाजप व्यतिरिक्त आठ आमदार एकत्र आले तर परिस्थिती बदलू शकते. अशा आमदारांकडून कोणतेही संदेश वा संकेत मिळालेले आहेत का असे विचारता तशा संकेतांची गरज नाही. सरकारात एकवाक्यता नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रत्येक बाबतीत सरकारला विरोध करताना दिसते आहे , अन्य मंत्र्यांची तोंडी भलतीकडे आहेत असे सरकार चालणार कसे असा सवाल त्यांनी केला व असे सरकार जितक्या लवकर जाईल तेवढे ते लोकांच्या हिताचे ठरेल असे सांगितले. या वेळी फातोर्डेचे आमदार दामू नाईक व युवा नेते रुपेश महात्मे हजर होते.

अशी ही ग्राहकांची फसवणूक
पेट्रोल - डिझेलवरील विक्रीकर कमी करण्याची घोषणा करून सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी उदाहरणासह केला . ते म्हणाले की या दोन्हींची जी दरवाढ झाली त्यामुळे व्हॅटव्दारा सरकारला जो महसूल मिळाला तेवढी देखील सवलत देण्याची दानत या सरकारने दाखविलेली नाही व तरीही ते स्वतःस आमआदमीचे म्हणवून घेते हीच मुळी या आम आदमीची क्रूर थट्टा आहे. वाढीव दरामुळे सरकारला पेट्रोलच्या एका लीटरमागे 94 पैसे जादा उत्पन्न मिळाले आहे तर त्याने दिलेली सवलत 85 पैसे आहे हे त्यांनी दाखवून दिले व म्हटले की प्रत्यक्षात ही सवलत 2 ते 2-50 रु. हवी होती . उ. प्र. सारख्या राज्यांनी तेवढी सवलत दिलेली आहे.

No comments: