पणजी, दि. १० (प्रतिनिधी): करंझाळे येथे बेकायदा नांगरून ठेवलेले "अंधेर नगरी' हे ट्रान्सशिप जहाज तेथून हटवण्याचे काम आज हाती घेण्यात आले. तथापि, त्यासाठी महाराष्ट्रातून आणलेले दोन "टग' किनाऱ्यांपर्यंत आणता येत नसल्याने मोठेच संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन ट्रॉलरद्वारे हे जहाज खेचण्याचे प्रयत्न सुरू होते. तसेच या जहाजामुळे मच्छीमारांची हानी झाल्याने सरकार किंवा जहाजाच्या मालकाने त्यांना दिवसाला १० हजार रुपये या दराने भरपाई द्यावी आणि हे जहाज तेथे नांगरण्यात आल्याने त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीला अटक व्हावी, अशा मागण्या माजी आमदार माथानी साल्ढाणा यांनी केल्या आहेत.
जेवढे दिवस हे जहाज तेथे असेल तेवढे दिवस ही भरपाई दिली जावी, असे माथानी यांनी गोंयच्या रापणकारांचो एकवट या संघटनेतर्फे आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. कोणत्याही सरकारी यंत्रणेची परवानगी न घेता हे जहाज करंझाळे किनाऱ्यावर नांगरण्यात आल्याचा दावा माथानी यांनी केला. यावेळी त्यांच्याबरोबर संघटनेचे अध्यक्ष आग्नेलो रॉड्रीगीस व सचिव फ्रान्सिको वाझ उपस्थित होते.
या जहाजामुळे मच्छिमारांचा व्यवसाय धोक्यात आला असून सुमारे ४५ कुटुंबावर थेट परिणाम झाला, तर अन्य ६० कुटुंबावर याची झळ पोचली असल्याचे ते म्हणाले. गेल्या ३१ मे पासून हे जहाज किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरण करताना त्या मार्गात येणाऱ्या घरांना नुकसान भरपाई दिली जाते. मग या जहाजामुळे ज्यांचे आर्थिक नुकसान झाले त्या मच्छीमारांना भरपाई मिळालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी संघटनेचे अध्यक्ष रॉड्रीगीस यांनी केली.
सध्या किनाऱ्यांवरील रेती वाहायला सुरुवात झाली असून त्याचा समुद्राच्या जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होणार आहे. याला जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई कराच, अशी आग्रही मागणी श्री. साल्ढाणा केली.
--------------------------------------------------------------------
माथानी साल्ढाणा म्हणतात...
"या जहाजामुळे मच्छीमारांची हानी झाल्याने सरकार किंवा जहाजाच्या मालकाने त्यांना दिवसाला १० हजार रुपये या दराने भरपाई द्यावी आणि हे जहाज तेथे नांगरण्यात आल्याने त्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीला अटक व्हावी''.
Tuesday 10 June, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment