Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 12 June, 2008

'अंधेरी नगरी' जहाज तीन दिवसांत हटवा

पर्यावरण खात्याची नोटीस
सरकारातच वादाची शक्यता
मच्छीमार अजूनही संतप्तच

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) : करंझाळे किनाऱ्यावर रुतलेले "अंधेरी नगरी' ट्रान्सशिपर हटवण्यावरून सरकाराअंतर्गतच आता वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पर्यटन तथा कॅप्टन ऑफ पोर्टस खात्याचे मंत्री मिकी पाशेको यांनी येत्या १७ जूनपर्यंत हे जहाज हटवण्याचे आदेश कॅप्टन ऑफ पोर्टसला दिलेले असतानाच आज राज्याच्या पर्यावरण खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या नव्या नोटिशीत हे जहाज हटवण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
पर्यावरण संचालक मायकेल डिसोझा यांनी आज ही नोटीस जारी केली असून हे जहाज हटवण्यासाठी येणारा खर्च मेसर्स साळगावकर मायनिंग उद्योग कंपनीकडून वसूल करावा असेही आदेशात म्हटले आहे. सावर्ड्याचे आमदार तथा मे. साळगावकर मायनिंग कंपनीचे मालक अनिल साळगावकर यांच्या मालकीचे हे जहाज आहे. साळगावकर हे अपक्ष आमदार असून त्यांचा सरकार पक्षाला पाठिंबा आहे, अशावेळी त्यांच्याशी चर्चा करून याबाबत तोडगा काढणे शक्य असताना केवळ आपली कातडी वाचवण्यासाठी सरकारअंतर्गत मंत्र्यांनी आपल्याच खात्यांना नोटिसा बजावण्याचा प्रकार हास्यास्पद असल्याचा आरोप रापणकारांनी केला आहे. कॅप्टन ऑफ पोर्टसने पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही देण्याची तसदी न घेतलेल्या साळगावकर यांच्याशी संपर्क न साधता पोर्ट तथा पर्यटन आणि पर्यावरणमंत्र्यांनी कॅप्टन ऑफ पोर्टसला लक्ष्य केले आहे. खराब हवामानामुळे हे जहाज हटवणे कठीण असल्याचे माहीत असूनही केवळ उपचार म्हणून सुरू असलेली ही सर्कस सरकारच्या निष्क्रियतेचेच दर्शन घडवते, असा आरोप त्या भागातील लोकांनी केला आहे.
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, की साळगावकर हे आमदार आहेत तसेच त्यांचा सरकारला पाठिंबा आहे. तथापि, कायद्यासमोर कुणीही श्रेष्ठ नसून याप्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. आमदारांची पाठराखण करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कायद्याप्रमाणे योग्य ती कारवाई केली जाईल. या जहाजामुळे करंझाळे येथील किनाऱ्याची हानी होण्याबरोबर येथील मच्छीमारी समूहाच्या पारंपरिक व्यवसायावरही गदा येण्याची शक्यता असल्याने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे जहाज हटवण्याची नितांत गरज आहे. किनारी भाग तथा सागरी जीवसृष्टीची मोठी हानी या जहाजामुळे होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत तात्काळ उपाययोजना करणे निकडीचे आहे.

No comments: