Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 June, 2008

पहिल्या पावसाने आम आदमी जाम

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): गोव्यात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून सक्रिय बनत चालला असून आज दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन पार विस्कळित झाले. काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने सकाळपासून अचानक आपला जोर वाढवल्याने खऱ्या अर्थाने पावसाळ्याची सुरुवात झाल्याचा अनुभव लोकांनी घेतला. येत्या ४८ तासांत मान्सून गोवा व कोकण भागात सक्रिय होणार आहे. याकाळात गोव्यात अनेक भागांत जोरदार गडगडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात दिवसभरात ३.५ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात एकूण १० इंच पाऊस पडल्याची माहिती पणजी वेधशाळेचे प्रमुख के.व्ही. सिंग यांनी दिली. सोमवारपासून गडगडाटासह प्रवेश केलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. संततधार पावसामुळे आज संपूर्ण गोव्यातील जनजीवन विस्कळित झाले. पावसाची सर्वात जास्त झळ दक्षिण गोव्याला बसली. खास करून मडगाव, काणकोण, फोंडा, कुंकळ्ळी आदी भागांत झाडे उन्मळून पडण्याचे अनेक प्रकार घडले. अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचेही प्रकार घडले आहेत. नावेली येथे लवू विर्डीकर यांच्या घरावर झाड पडल्याने हजारो रुपयांची हाती झाली. मडगाव येथील राजेंद्र प्रसाद स्टेडियमजवळील रस्ता भुयारी वीज वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेला असल्याने पावसामुळे या रस्त्याच्या कडा कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वास्को मेरशीवाडा येथे काही घरांत पावसाचे पाणी घुसल्याने बरेच नुकसान झाले.
राजधानी पणजीत विविध ठिकाणी भरलेल्या पाण्यामुळे वाहनचालक तथा पादचाऱ्यांचे मोठ्याप्रमाणात हाल झाले. पणजी कदंब बसस्थानकाचा भाग पूर्णपणे पाण्याखाली आल्याने वाहनचालकांना त्रास झाला. संपूर्ण रस्ताच पाण्याखाली गेल्याने रस्ता कुठे व गटार कुठे, अशीच जणू परिस्थिती निर्माण झाली. यंदा महापालिकेने १८ जून रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीची कामे सुरू असल्याने तेथे भरणारे पाणी मात्र यावेळी खूप प्रमाणात कमी झाल्याचे समाधान येथील दुकानदार तथा या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी व्यक्त केले. कला अकादमी ते मिरामारपर्यंतचा रस्ताही जलमय झाल्याने वाहनचालकांची मोठीच गोची यावेळी झाली. मिरामारचा हा रस्ता रुंद असल्याने या रस्त्यावरून कार, तथा इतर वाहने वेगाने जात असल्याने या वाहनांमुळे उसळत असलेल्या पाण्यामुळे अनेक दुचाकी चालकांना पावसाच्या पाण्याने आंघोळ घडली. जुने सचिवालय तथा सत्र न्यायालयासमोरील भागातही रस्त्याच्या कडेला पाणी भरल्याने वेगाने जात असलेल्या वाहन चालकांमुळे दुचाकीस्वारांची बरीच पंचाईत होत असल्याच्या तक्रारीही ऐकायला मिळाल्या.

No comments: