मीरपूर, दि. १२ : किटप्लाय तिरंगी मालिकेतील आज खेळविण्यात आलेल्या सामन्यात अपेक्षेप्रमाणे भारताने बांगलादेशचा ७ गड्यांनी पराभव केला. आजच्या पराभवामुळे बांगलादेशचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडलेला गौतम गंभीर सामनावीर ठरला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांच्या खेळातून ४.४५ धावांच्या सरासरीने १२ अवांतर धावांच्या मदतीने सर्व गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावा काढून भारतासमोर विजयासाठी २२३ धावांचे आव्हान उभे केले होते. ते आव्हान सहज पेलताना, भारताने ३५.१ षटकांच्या खेळातून फक्त तीन गड्यांच्या मोबदल्यात ६.३४ सरासरीने २२३ धावा करून विजय प्राप्त प्राप्त केला.
आज नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याला प्राधान्य दिले. तमिम इक्बाल व शाहरियार नफीज यांनी बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. परंतु प्रवीणकुमारने पहिल्याच षटकात इक्बालला धोनीच्या हस्ते बाद करून बांगलादेशला पहिला झटका दिला. त्यावेळी बांगलादेशने आपले खातेही उघडले नव्हते. दुसरा सलामीवीर नफीजही फार वेळ टिकला नाही. त्याला ९ धावांवर आर.पी.सिंगने त्रिफळाचीत करून परतीचा मार्ग दाखविला. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेला बांगलादेशचा कर्णधार मोहम्मद अश्रफुल व राकिबुल हसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अश्रफुलने २ चौकारांच्या मदतीने ६७ चेंडूत ३६, तर हसनने ११७ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या. रहिम अपेक्षित कामगिरी पार पाडण्यात अयशस्वी ठरला. त्याने फक्त ६ धावा केल्या. अलोक कपालीने २०, महमुदुल्लाने २४, तर मोर्तझाने १३ धावांचे योगदान दिले. अब्दुर रझ्झाकने नाबाद ८, तर रेझाने ५ धावा केल्या. अशा प्रकारे बांगलादेशने ४९.५ षटकांच्या खेळातून सर्व गड्यांच्या मोबदल्यात ४.४५ सरासरीने १२ अवंातर धावांच्या मदतीने २२२ धावा केल्या होत्या.
भारतातर्फे आर.पी.सिंगने ३, इरफान पठाणने २, तर प्रविणकुमार, पीयूष चावला व युसुफ खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
भारताच्या डावाची सुरुवात गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग या जोडीने केली. त्यांनी ८५ धावांची सलामी देताना दमदार सुरुवात केली.
७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३२ चेंडूत ५९ धावांची आक्रमक खेळी केल्यानंतर सेहवाग महमुदच्या गोलंदाजीवर इक्बालच्या हस्ते झेलचित झाला.
तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या रोहित शर्माने सावध खेळी करताना गौतम गंभीरला सुरेख साथ दिली. त्याने २६ धावांचे योगदान दिले. युवराज सिंगने एकेरी दुहेरी धावावर भर देत गौतम गंभीरला फटकेबाजीसाठी प्रेरित केले. संघाला विजयासाठी अवघ्या सात धावांची गरज असताना तो २६ धावांवर बाद झाला. गंभीरने १३ चौकार व १ षटकाराच्या मदतीने नाबाद १०७ धावा करून संघाला विजय प्राप्त करून दिला.
बांगलादेशतर्फे रेझा, रझ्झाक व महमुदने प्रत्येकी १ गडी बाद केला.
आता या स्पर्धेतील अंतिम सामना १४ रोजी भारत व पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणार आहे.
धावफलक:
तमिम इक्बाल झे. धोनी गो. प्रवीणकुमार ०, शाहरियार नफीज त्रि. गो. आर.पी.सिंग ९, मोहम्मद अश्रफुल झे. व गो. युसुफ पठाण ३६, राकिबुल हसन झे. प्रवीणकुमार गो. आर.पी.सिंग ८९, मुशफिकर रहिम झे. रैना गो. चावला ६, अलोक कपाली त्रि. गो. इरफान पठाण २०, महमुदुल्ला झे. सेहवाग गो. आर.पी.सिंग २४, फरहाद रेझा धावचित गो. (धोनी/शर्मा) ५, मश्रफी मोर्तझा धावचित (धोनी) १३, अब्दुर रझ्झाक नाबाद ८, डॉलर महमुद झे. कुमार गो. इरफान पठाण ०, अवांतर ः १२. एकूण ः (४९.५ षटकांत सर्वबाद) २२२.
गडी बाद होण्याचा क्रम ः १-०, २-१७, ३-९३, ४-१०६, ५-१५२, ६-१८७, ७-१९६, ८-२०९, ९-२२२, १०-२२२.
गोलंदाजी ः
प्रवीणकुमार १०-२-३२-१, आर.पी.सिंग १०-१-४६-३, इरफान पठाण ८.५-०-४८-२, पीयूष चावला १०-०-४२-१, युवराज सिंग २-०-१०-०, युसुफ पठाण २-०-९-१, वीरेंद्र सेहवाग ७-०-३३-०.
भारत ः
गौतम गंभीर नाबाद १०७, वीरेंद्र सेहवाग झे. तमिम इक्बाल गो. डॉलर महमुद ५९, रोहित शमा झे. मोर्तझा गो. रझ्झाक २६, युुवराज सिंग त्रि.गो. फरहाद रेझा २६, सुरेश रैना नाबाद ०,अवांतर ः ५. एकूण ः (३५.१ षटकांत) ः३ बाद २२३
गडी बाद होण्याचा क्रम ः १- ८५, २-१४१, ३-२१६.
गोलंदाजी ः
मश्रफी मोर्तझा ८-०-३३-०, फरहाद रेझा ५.१-०-४५-१, डॉलर महमुद ४-०-४२-१, अब्दुर रझ्झाक १०-०-४८-१, महमुदुल्ला ७-०-४२-०, अलोक कपाली १-०-१३-०.
Thursday 12 June, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment