Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 8 June, 2008

`अंधेरी नगरी' किनाऱ्यावर आल्याने करंझाळेला धोका

पणजी, दि. 8 (प्रतिनिधी) - कांदोळी येथील "रिव्हर प्रिन्सेस' नंतर आता त्याच मालकाचे "अंधेरी नगरी' हे जहाज करंंझाळे किनाऱ्यावर लागल्याने येथील समुद्राला आणि मच्छीमारी करणाऱ्या कुटुंबीयांच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. काल परवापर्यंत समुद्रात उभे करून ठेवलेले हे जहाज खवळलेल्या समुद्रामुळे आज किनाऱ्याला लागले आहे. येथील मच्छीमार बांधवांनी या जहाजाला जोरदार आक्षेप घेतला असून 48 तासांत येथून हे जहाज हटवले न गेल्यास कायदा हातात घ्यावा लागणार असल्याचा इशारा "गोंयच्या रापणकारांचो एकव्होट' या संघटनेने दिला होता. अठ्ठेचाळीस तास उद्या पूर्ण होणार असून सदर जहाज येथून हटवले नसल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदर जहाज एकदम किनाऱ्यापर्यंत आल्याने आज दिवसभर अनेक लोकांनी ते पाहण्यासाठी समुद्रावर गर्दी केली होती. या जहाजामुळे येथील समुद्रातील जीवसृष्टीलाही धोका पोचणार असल्याचे मत गोंयच्या रापणकारांचो एकवोट या संघटनेचे सचिव तथा माजी आमदार माथानी साल्ढाणा यांनी व्यक्त केला आहे.
कॅप्टन फिरकलेच नाहीत
या "अंधेरी नगरी' जहाजामुळे मच्छीमारी करणाऱ्यांना आपल्या होड्या नेता येत नाहीत, तसेच त्यांना अनेक अडचणींना व अपघात होण्याची शक्यता असल्याने याच्या विरोधात कॅप्टन ऑफ पोर्टस्ला अनेक तक्रारी करूनही पोर्टचे कॅप्टन मास्कारेन्हास अद्याप त्याठिकाणी फिरकलेच नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काल रात्री मांडवी नदीत उभी करून ठेवलेले "गोवा प्राईड' या कॅसिनो जहाजाचा नांगर तुटल्याने पोर्ट कॅप्टन मास्कारेन्हास यांनी जातीने लक्ष घालून ती जेटीपर्यंत आणण्यास मदत केली. परंतु मच्छिमाऱ्यांना, येथील अनेक घरांना आणि किनाऱ्याला या अंधेरी नगरी जहाजामुळे धोका निर्माण झाला असताना तसेच अनेक तक्रारी करूनही कॅप्टन मास्कारेन्हास फिरकले नसल्याने मच्छिमाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

No comments: