Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 23 June, 2008

खाणसमर्थक नेत्यांना हटविल्यासच बेकायदा खाणी बंद होतील : पर्रीकर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)ः गोव्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण उद्योग सुरू आहे व या उद्योगात विद्यमान सरकारातील एकूण दहा सदस्य सामील आहेत. केवळ आंदोलन किंवा निषेध नोंदवून हा बेकायदा खाण उद्योग बंद होणार नाही तर त्यासाठी खाण उद्योगाच्या पाठीराख्या राजकीय नेत्यांना हटवण्याची गरज आहे. गोव्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार खाली खेचाल तरच या बेकायदा खाण उद्योगापासून सुटका होईल, असे विधान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिवालयात गृह खात्याच्या अस्थायी समितीच्या बैठकीत खाण विरोधी आंदोलनात काही नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांनी प्रवेश केल्याचा मुद्दा उपस्थित होऊन सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आपण सुचवले होते. देशातील विविध भागांत "सिमी' संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असता त्यांच्या चौकशीत गोव्यातही त्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे व तशी माहिती इंटरनेटच्या विविध वृत्तांतही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. राज्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय परवडणारी नाही, त्यामुळे गोव्यात नक्षलवादी संघटना खाण विरोधी आंदोलनात सामील झाल्याचा अर्थ सगळेच नक्षलवादी आहेत, असा अजिबात होत नाही असे पर्रीकर यांनी सांगितले. या नेत्यांकडून वेळोवेळी लोकांना देण्यात येणाऱ्या भाषणांत कायदा, न्यायालय यांच्यावरील लोकांचा विश्वास उडावा अशी भडक वक्तव्ये केली गेली आहेत. हत्यारांचा वापर करून पोलिसांवर कशा पद्धतीने हल्ला करावा याचीही माहिती देण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने या सर्व गोष्टींवर पोलिसांची नजर आहे हे त्यांनी मान्य केल्याचे स्पष्टीकरण पर्रीकर यांनी केले.
विविध स्वयंसेवी संस्थांचे व्यवहारही पारदर्शक असावेत, अशी मागणी करून या संस्थांचे आर्थिक व्यवहार जनतेसाठी खुले व्हावेत, असे मत पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केले. राजकीय पक्षांचे सर्व व्यवहार जसे माहिती हक्क कायद्याखाली आणण्यात आले आहेत त्याच प्रकारे या संस्थांचे व्यवहारही जनतेसाठी खुले होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याच्या सुरक्षिततेकडे कोणतीही तडजोड अजिबात परवडणारी नाही. गोव्यात बेकायदा खाण उद्योगामुळे आपल्या हक्कांसाठी स्थानिकांनी पुकारलेला लढा समर्थनीय आहेच परंतु केवळ या लढ्यांना फुस लावून लोकशाही पद्धतीच्या लढ्याला हिंसेचे वळण देण्याचा प्रकार घातक असल्याने अशा घटकांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. गोव्यात काही नक्षलवादी संघटनेचे सदस्य अशा आंदोलनात सहभागी आहेत याची पोलिसांनाही कल्पना आहे, त्यामुळे आपण खाणविरोधी आंदोलकांना नक्षलवादी संबोधल्याची जी आवई सुरू आहे ती निरर्थक असल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
------------------------------------------------------------
'सगळेच नक्षलवादी नाहीत'
गोव्यात नक्षलवादी संघटना खाणविरोधी आंदोलनात सामील झाल्याचा अर्थ सगळेच नक्षलवादी आहेत, असा अजिबात होत नाही असे पर्रीकर यांनी सांगितले. विनाकारण आपल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास केला जात असल्याचे ते म्हणाले. खाण व पर्यावरणाचा विषय हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या काही बिगरसरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याविरोधात चालवलेली आगपाखड अर्थहीन असल्याचे सांगून त्यांचा जर अशा प्रकरणात सहभाग नाही तर त्यांना चिंता करण्याची गरजच काय,असा सवालही पर्रीकर यांनी उपस्थित केला.

No comments: