Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 June, 2008

हत्तींना रोखण्यासाठी कायमस्वरूपी योजना

पणजी, दि. 25 (प्रतिनिधी)- गोव्यात रानटी हत्तींनी मांडलेला उच्छाद थोपवण्यासाठी वन खात्यातर्फे कायमस्वरूपी योजना आखण्यात येत आहे. मूळ कर्नाटकातील हत्ती महाराष्ट्रामार्गे गोव्यात दाखल होत असल्याने त्यांना परत कर्नाटकात पाठवण्यासाठी महाराष्ट्र व गोव्याने एकत्रित मोहीम हाती घेण्याचा निर्णय केल्याची माहिती कार्यवाहू मुख्य वनसंरक्षक सी. ए. रेड्डी यांनी दिली.
गोव्याचे मुख्य वनसंरक्षक ओंकारसिंग यांची बदली झाल्याने या महिन्याच्या 16 तारखेला कार्यवाहू म्हणून ताबा घेतलेले श्री. रेड्डी हे यापूर्वी रानटी हत्तींचा संचार असलेल्या भागात काम करून आलेले अधिकारी आहेत. त्यामुळे या विषयातील दांडगा अनुभव व कार्यशैली सरकारला उपयुक्त ठरणार आहे. वन खात्याच्या पूर्व अनुभवानुसार आता हत्तींना परतवण्यासाठी नवी आखणी करण्यात आली आहे. हत्तींच्या हालचालींची व त्यांच्या वागणुकीची पूर्ण जाणीव असलेले तसेच हत्तींचा वास, आवाज, पावलांच्या खुणा आदींवरून हत्तींचा मागोवा घेणारे "कवाडी' कर्नाटकातून मागवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत तीन ते चार "कवाडी' गोव्यात दाखल होणार असल्याचे श्री. रेड्डी म्हणाले. कर्नाटकातील जंगली भागात ही जमात राहते. हत्तींच्या बंदोबस्तासाठी कर्नाटक सरकारने त्यांना सरकारी सेवेत सामील करून घेण्यात आले आहे. हे कवाडी हत्तींचा मागोवा घेणार असून हत्ती नक्की कुठे असतात याचा शोध ते घेणार आहेत. त्यानंतर काही खास माहुतही मागवण्यात येणार आहेत.
हत्तींच्या हालचालींवर वनरक्षकांचे कायमस्वरूपी लक्ष असून चोवीस तास हे लोक कामावर आहेत. गोव्यातील हत्तींच्या प्रकरणाचा सखोल अभ्यास रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी वनरक्षक व वनाधिकारी यांच्या धाडसाचे कौतुक केले. गोव्यात रानटी हत्ती हा नवीन अनुभव असल्याने हत्तींमुळे हैराण झालेल्या लोकांनी याबाबत वन खात्याला दोषी ठरवून हे खाते निष्क्रिय किंवा हतबल झाल्याचा समज करून घेऊ नये. हत्तींचा सामना करण्यासाठी कोणतेही हत्यार किंवा तत्सम वस्तू हातात घेऊन हत्तींना जिवंत मारता येत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हत्ती हा अतिशय चतुर व ताकदवान प्राणी आहे. एकदा जर माणूस त्याच्या वाटेला गेला तर त्याचा माग धरून त्या माणसाला इजा करण्याची या प्राण्याला सवय आहे. हळर्ण येथे घडलेली घटना व त्यात वनरक्षक राजेंद्र भगत याचा प्राण गेला ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून त्या दिवशी स्थानिक लोकांनी वनरक्षकांवर बाहेर पडण्याचे दडपण आणल्याने त्यांना तिथे जाणे भाग पडल्याचे रेड्डी म्हणाले.
एकदा का हत्ती चवताळला तर तो बेफामपणे मागे धावतो व त्यात कोणाचा जीव जाईल याचा पत्ता लागणे कठीण असते. स्थानिक लोक खास करून महिला व लहान मुले ज्याप्रमाणे वनअधिकाऱ्यांना आपली सेवा बजावताना त्रास करतात त्यावर स्थानिक पंचायत सदस्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शेवटी हत्ती हे प्राणी असल्याने त्यांच्याकडून हल्ला झाल्यास मुळात हत्तीपेक्षा या लोकांना वाचवणे कठीण बनण्याची परिस्थिती उद्भवत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पुढील महिन्यात गोवा व महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याची वरिष्ठ पातळीवर बोलणी होणार आहे. गोव्यातील एकूण परिस्थिती व हत्तींमुळे उद्भवलेली परिस्थिती याबाबत केंद्रीय वन खात्यालाही पत्र पाठवण्यात आले असून जीवितहानी टाळण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्याची परवानगी मागवली आहे. दरम्यान, हत्तींना सीमेवर रोखण्यासाठी "इपीटी' (एलिफंट प्रूफ ट्रेन्च) व (सोलर फेन्सींग) आदींबाबतही विचार सुरू आहे. महाराष्ट्रातून नक्की कोणत्या मार्गाने हत्ती गोव्यात दाखल होतात या ठिकाणांचा शोध लावून या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यापुढे हत्ती महाराष्ट्रात पाठवले तरी ते नक्की महाराष्ट्रात कुठे आहेत व गोव्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे की काय याचा मागोवा नियमित घेण्यासाठी त्या भागातही वनरक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.
तात्काळ भरपाई देणार
हत्तींनी मांडलेल्या उच्छादामुळे शेतकऱ्यांना झालेले नुकसान ताबडतोब देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. गेल्या काही वर्षापूर्वीची प्रलंबित नुकसान भरपाई पुढील आठवड्यापर्यंत लोकांना वितरित केली जाणार आहे. यात बार्देश तालुक्यातील एकूण 25 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या अर्जांची रक्कम मुळात 67,700 रुपये होत असली तरी वन खात्यातर्फे सुधारीत रकमेचा फायदा या लोकांना देण्यासाठी अतिरिक्त 85,900 रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारकडे आत्तापर्यंत एकूण 153 अर्ज सादर झाले आहेत व त्यांची छाननी सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत हत्तींना परत पाठवण्यापासून ते लोकांना नुकसानभरपाई देण्यावर सुमारे 16 लाख रुपये खर्च झाल्याची माहितीही रेड्डी यांनी दिली.

सेवेसाठी तत्पर
हत्तींचा संचार सुरू असलेल्या भागातील लोकांनी सबुरीने वागावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे. हत्तींचा मागोवा विनाकारण घेतल्यास, तेथे गर्दी केल्यास वा त्यांना निष्कारण त्रास दिल्यास ते चवताळू शकतात. एखाद्या भागात हत्ती आल्यास किंवा त्यांना कोणी पाहिल्यास ताबडतोब त्याबाबतची माहिती उपवनसंरक्षक एम. के. शंभू (9422437137), साहाय्यक वनसंरक्षक अनिल शेटगावकर(9822587607) साहाय्यक वनसंरक्षक श्री. हेन्रीक (9822137445 व 9423061700) यांना द्यावी.

No comments: