Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 28 June, 2008

मोरजी दि. २८ (वार्ताहर): पेडणे तालुक्यातील इब्रामपूर भागात काल २७ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल झालेल्या हत्तींनी गंगाधर गवस, सतीश नाईक व अशोक धाऊस्कर यांच्या ऊसाच्या मळ्याची व बागायतींची मोठ्या प्रमाणात नासाडी केली.
४ हत्तींचा कळप इब्रामपूर शेत बागायतीत काल सकाळी पाहिल्याची माहिती तेथील शेतकरी सुधीर धाऊसकर, प्रसाद सावंत व शैलेश हळर्णकर यांनी दिली.
इब्रामपूर बागायतीत हत्ती आल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मिळताच विभागीय वन अधिकारी एस्. आर. प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून रानात मोहीम सुरू झाली होती.
हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजवणे, फटाके आदींचा वापर रानात केला जात होता. घनदाट जंगलात गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर फटाक्यांचा आवाज गावात ऐकायला येत होता. ढोल वाजवत वाजवत हत्तींना पिटाळण्यात येत असल्याची माहिती ा साहाय्यक वन अधिकारी अनिल शेटगावकर यांनी दिली.
स्थानिकांचा सहभाग
"गोवादूत'चा वार्ताहर व सुधीर धाऊसकर, प्रसाद सावंत आणि शैलेश हळदणकर हे चौघेजण हत्तींचा माग होता त्या वाटेने दाट जंगलात अर्ध्यावर पोहोचले. काही काळानंतर ढोल, फटाक्यांचा आवाज बंद झाला. मात्र, हत्ती काही क्षणापूर्वीच त्या भागातून गेल्याचा माग स्पष्ट दिसत होता. फटाके बंद झाले व वन अधिकारी कुठल्या दिशेने गेले त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिकांनी आवाज केला, परंतु पलिकडून प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिकही घाबरले. मग शेटगावकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण गावात रस्त्याच्या बाजूला असल्याचे सांगून हत्तींवर नजर ठेवून आहोत असे स्पष्ट केले.
तुम्ही माघारी फिरा, जोखीम पत्करू नका. हत्ती जवळपास असतील, हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जंगलातून परत माघारी फिरा असे शेटगावकर यांनी सांगितल्यानंतर स्थानिक युवक माघारी फिरले.
हत्तींना पिटाळण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस्. आर. प्रभू यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी महानंद पर्येकर, दत्ता बोरकर, सत्यवान गावस, सुभाष आरोंदेकर व इतर १५ कर्मचारी रानत गेले असल्याची शेटगावकर यांनी माहिती दिली.
रानातून हत्तींना पिटाळण्यासाठी गेलेल्या वन अधिकाऱ्यांकडे बारा बोअरची बंदूक व इतर सामुग्री देण्यात आली आहे.
या मोहिमेसाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेटगावकर यांनी केले आहे.गावात पुन्हा हत्ती येऊन नयेत म्हणून वन खाते कार्यरत आहेत. त्यासाठी रात्री स्थानिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगायला हवी. बागायतीत व शेतात जे शेतकरी जातात त्यांनी संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परतावे.
गोवा व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने हत्तीविरोधी मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. हत्तींना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील घनदाट जंगलात त्यांची रवानगी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीची नुकसानी हत्तींनी केली, त्याची पाहणी व पंचनामे पेडणेचे मामलेदार भूषण सावईकर यांनी केले.

No comments: