Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 March, 2008

चार वर्षात "आम आदमी'ची
आठवण का झाली नाही?' अडवाणी

नवी दिल्ली, दि.२९ - ""गेल्या चार वर्षांत केंद्रातील संपुआ सरकारला आम आदमीची आठवण का झाली नाही. आताच या सरकारला त्यांची आठवण का व्हावी,'' असा बोचरा सवाल करताना ""रेल्वेपाठोपाठ केंद्रीय अर्थसंकल्पही मतदारांच्या मतांवर डोळा ठेवणाराच आहे,' असा आरोप विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केला.
"गेल्या चार वर्षांपासून "आम आदमी' महागाईच्या आगीत होरपळत आहे. शेतकरी कर्जामुळे आत्महत्या करीत आहे. तेव्हा मात्र सरकारला त्यांची मुळीच दया आली नाही. आता निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असल्याने या सरकारला "आम आदमी' आणि त्यांची मते दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांसाठी हाच पुळका चार वर्षांआधीच दाखविला असता तर किमान ३२ हजार शेतकऱ्यांचे जीव वाचविता आले असते,' असे अडवाणी यांनी आज संसदेत सादर झालेल्या २००८-०९ वर्षाच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितले.
आपल्या शेवटच्या काळात सरकारला आपली आठवण का व्हावी, हे समजण्याइतका मतदार मूर्ख नाही. या सरकारचा ढोंगीपणा त्यांनी ओळखला आहे. त्यामुळे या मृगजळासारख्या दिसणाऱ्या अर्थसंकल्पाचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, असेही अडवाणी म्हणाले.
भाजपाचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनीदेखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे संपुआ सरकारचा निवडणूक जाहीरनामा आहे. लोकसभेची निवडणूक किती जवळ आलेली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न सरकारने यातून केलेला आहे, असे त्यांनी सांगितले.

No comments: