लालूंची "निवडणूक एक्स्प्रेस'
आश्वासने व सवलतींची खैरातलालूप्रसाद म्हणाले, "चक दे रेल्वे...'
पुणे-नागपूर गरीब रथ धावणार
अमरावती-मुंबई नवी गाडी
दहा नवे गरीब रथ आणि ५३ नव्या गाड्या
ज्येष्ठ महिलांना आता ५० टक्के सवलत
विद्यार्थ्यांना मोफत प्रवासाची सुविधा
मुंबईकरांसाठी "गो मुंबई कार्ड'
कर्मचाऱ्यांना ७० दिवसांचा बोनस
५० रुपयांच्या तिकिटावर एक रुपया सूट
रेल्वेला २५ हजार कोटी रुपयांचा नफा
कुलींना मिळणार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा
वेटिंगचे तिकीटही इंटरनेटवरून मिळणार
मुंबईसह चार स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार
२०१० पासून स्टेनलेस स्टीलचे डबे
नवी दिल्ली, दि.२६ ः प्रवासी भाडे आणि मालवाहतूक भाड्यात कोणतीही वाढ न करता उलट, त्यात कपात सुचविणारा, "निवडणुकीवर डोळा' ठेवून तयार केलेला रेल्वे अर्थसंकल्प रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज लोकसभेत सादर केला. त्यांचा हा सलग पाचवा आणि विद्यमान संपुआ सरकारचा शेवटचा रेल्वे अर्थसंकल्प आहे. २००८ हे वर्ष निवडणुकीचे म्हणून आधीच जाहीर झाले असल्याने तमाम मतदारांना खुश करताना लालूप्रसाद यादव यांनी आपल्या अर्थसंकल्पात सर्वच प्रकारच्या प्रवासी भाड्यात तसेच मालभाड्यात कपात जाहीर केली. याशिवाय, " ज्येष्ठ महिलांसाठी प्रवास भाड्यात कपात, विद्यार्थ्यांना शाळेपासून घरापर्यंत प्रवासात सवलत योजनाही त्यांनी जाहीर केली. एड्सग्रस्तांना सर्वच रेल्वेगाड्यांमध्ये तिकीट दरात ५० टक्केपर्यंत सवलत मिळणार आहे. ही दरकपात आणि सवलती येत्या एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. पुणे-नागपूरसह १० नवीन "गरीब रथ' आणि ५३ नव्या गाड्यांची घोषणा करताना अनेक गाड्यांचा त्यांनी विस्तारही केला आहे. यानुसार आता नागपूर-रायपूर एक्सप्रेस बिलासपूरपर्यंत धावणार आहे. २००७-०८ या वर्षात रेल्वेला २५ हजार कोटी रुपयांचा नफा झाला असल्याचे जाहीर करताना लालू यादव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांकरिता यंदा ७० दिवसांचा बोनस जाहीर केला. एकूणच लालूंचा हा अर्थसंकल्प म्हणजे "निवडणूक अर्थसंकल्प'च ठरला आहे.
सकाळी ११ वाजता हा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार होता. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लालूंनी तो दुपारी १२ वाजता लोकसभेत सादर केला. यानंतर त्यांनी अर्थसंकल्पाची प्रत राज्यसभेतही सादर केली. या अर्थसंकल्पात वार्षिक योजना खर्च ३७५०० कोटी रुपयांचा असून आजवरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी तरतूद आहे. नव्या मार्गांसाठी १७३० कोटी रुपयांचीही तरतूद करण्यात आली आहे. यावेळी लालू म्हणाले, "एवढ्यावरच समाधान मानू नका. लवकरच मी आणखी खूप काही देणार आहे.'
आपल्या रेल्वेवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असल्याचे सुरुवातीला स्पष्ट करीत लालूंनी तमाम भारतीयांवर सवलती आणि सुविधांचा जोरदार वर्षाव केला. सर्व गाड्यांमधील द्वितीय श्रेणी आणि वातानुकुलीत प्रवासात मोठी कपात जाहीर केली. यानुसार, प्रथम श्रेणी वातानुकुलीत प्रवासात ७ टक्के, द्वितीय श्रेणी वातानुकुलीत प्रवासात ४ टक्के आणि तृतीय श्रेणी वातानुकुलीत प्रवासात ३ टक्के दरकपात करण्यात आली आहे. द्वितीय श्रेणी शयनयान डब्यातून प्रवास करणाऱ्यांना पाच टक्के कपात मिळणार आहे. त्याचप्रमाणे मालभाड्यात लालूंनी सरसकट १४ टक्के दरकपात जाहीर केली आहे.
देवी लक्ष्मीची रेल्वेवर कृपा कशी आहे हे स्पष्ट करताना लालूंनी सांगितले की, मालवाहतूक भाड्यातून यावर्षी रेल्वेला १४ हजार कोटी रुपयांचे आणि प्रवासी भाड्यातून ३३४२७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रेल्वेतील भांडवली गुंतवणुकीवर प्राप्त झालेला परतावा २१ टक्के इतका असून स्वतंत्र भारताच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे, असेही त्यांनी जाहीर केले. लालूंनी यावेळी स्वत:ची तुलना "चक दे इंडिया' या चित्रपटातील शहारूख खानशी केली. त्याने ज्याप्रमाणे एकामागोमाग गोल केले तसेच गोल मीदेखील केले आहेत. यामुळेच मी आज "चक दे रेल्वे' असा नारा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाला लालूंनी शेरोशायरीची जोड देऊन सभागृहात खसखस पिकविली.
लालूंनी आपल्या अर्थसंकल्पात प्रवाशांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन लाख ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
रेल्वेच्या आधुनिकीकरणावर विशेष भर देताना त्यांनी देशातील ५० निवडक रेल्वे स्थानकांवर "एस्केलेटर' उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी सादर केला. रेल्वेचे प्रवास आणि मालभाडे वाढविण्यापेक्षा आम्ही रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले.
कुलींना दिलासा
लालूंनी आपल्या अर्थसंकल्पातून देशभरातील कुलींना मोठा दिलासा दिला आहे. परवानाधारक कुलींना त्यांनी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार परवानाधारक कुलींना गॅंगमनची नोकरी आणि गॅंगमनला गेटमनची नोकरी दिली जाणार आहे. गॅंगमनला गेटमन या पदावर बढती देण्यात आल्यानंतर रिक्त होणाऱ्या हजारो जागांवर परवानाधारक कुलींची शक्य तितक्या लवकर नियुक्ती करण्याचा माझा प्रयत्न राहील. याशिवाय, रेल्वेतील चतुर्थ श्रेणीच्या अन्य पदांवरही कुलींची नियुक्ती करण्यात येणार आहे. लालूंनी ही घोषणा करताच देशभरातील रेल्वेस्थानकांवर त्यांचे भाषण ऐकत असलेल्या कुलींनी मिठाई वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलती
लालूंनी आपल्या भाषणात ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि एडस्ग्रस्तांवरही सवलतींचा वर्षाव केला. वयाची ६० वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात ३० टक्के सवलत, महिलांना ५० टक्के आणि एडस्ग्रस्तांना ५० टक्के प्रवास सवलत जाहीर करताना, अशोकचक्र विजेत्यांना त्यांच्याकडे असलेल्या पासवर देशातील सर्वच गाड्यांमधून प्रवास करण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे अशोकचक्र मिळालेल्यांना आता राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसमधूनही मोफत प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत या दोन्ही गाड्यांमधून प्रवास करण्याची सवलत त्यांना नव्हती. यापूर्वी, सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ६५ वर्षे ही वयोमर्यादा होती. ती आता साठ करण्यात आली आहे.
याशिवाय, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही लालूंनी खुश केले. त्यांना आता घरापासून तर शाळेपर्यंत आणि शाळेपासून घरापर्यंत प्रवास करण्यासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही. लालूंनी त्यांना मोफत रेल्वे प्रवासाची सोय उपल्बध करून दिली आहे.
"मदर चाईल्ड' एक्सप्रेस
धावत्या रेल्वेतच गरोदर महिलेवर प्रसुतीचा प्रसंग अनेकदा येतो. रेल्वेत त्यांची प्रसुती सुलभ करण्यासाठी कुठल्याही सुविधा नसल्याने अनेक महिलांचा मृत्यूही होत असतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन लालूंनी "मदर चाईल्ड एक्सप्रेस' सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. याच वर्षी ही एक्सप्रेस धावणार आहे. या रेल्वेत महिला डॉक्टर आणि परिचारिकांसह प्रसुती आणि बाळाच्या संगोपनाच्या सर्वच सविधा उपलब्ध राहणार आहेत.
७० दिवसांचा बोनस
लक्ष्मीच्या कृपेने २००७-०८ या वर्षात रेल्वेला विक्रमी असा २५ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. रेल्वेत काम करणाऱ्या प्रत्येकच कर्मचाऱ्याच्या अथक परिश्रमामुळेच हा नफा होऊ शकला असल्याने या नफ्यात प्रत्येक कर्मचारी वाटेकरी आहे. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात रेल्वेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ७० दिवसांचा बोनस देण्यात येणार असल्याचे लालूंनी जाहीर केले. आतापर्यंत रेल्वे कर्मचाऱ्यांना ६५ दिवसांचा बोनस मिळत होता.
प्रवासी सुविधा वाढविल्या
प्रवाशाना दिलासा देण्यासाठी लालूंनी माहिती तंत्रज्ञान सुविधांचा विस्तार करताना "ऑन बोर्ड इंटरनेट सुविधा' आणि प्रतीक्षा सुचीतील (वेटिंग) तिकीटही इंटरनेटवरून उपलब्ध होण्याची घोषणा त्यांनी केली. याशिवाय, प्रवाशांकरिता मेल आणि एक्सप्रेसमध्ये येणारे स्थानक, त्याचे अंतर आणि स्थानक येण्याची संभावित वेळ इत्यादीची माहिती देण्यासाठी डिस्प्ले लावण्याची घोषणाही त्यांनी केली. लहान दर्जांच्या फलाटांना मध्यम दर्जा आणि मध्यम दर्जांच्या फलाटांना उच्च दर्जा देण्याचा, देशातील चार मोठ्या स्थानकांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा तसेच "अ' व "ब' श्रेणीच्या देशातील १९५ स्थानकांवर "फूट ओव्हरब्रिज' बांधण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.
ज्या चार स्थानकांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येणार आहे त्यात, नवी दिल्ली, सिकंदराबाद, पाटणा आणि मुंबईचा समावेश आहे.
याव्यतिरिक्त देशातील २० निवडक स्थानकांवर बहुस्तरीय पार्किंगची सुविधा आणि डिस्प्ले फलक लावण्याची घोषणाही त्यांनी आपल्या भाषणात केली. रेल्वे स्थानकांवरील गुन्हेगारी रोखण्यासाठी क्लोज सर्किट टीव्ही आणि मेटल डिटेक्टर लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलेे.
पुढील वर्षीपासून स्टेनलेस स्टीलचे डबे
पुढील वर्षी रेल्वे गाड्यांसाठी स्टेनलेस स्टीलच्या डब्यांचे उत्पादन करण्यात येईल आणि २०१० पासून देशातील प्रत्येक गाडीला केवळ स्टेनलेस स्टीलचेच डबे जोडण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली. रेल्वे गाडीतील शौचालयातील घाण रूळांवर पडणार नाही याची काळजी घेताना प्रत्येक गाडीत अत्याधुनिक ग्रीन टॉयलेट बसविण्यात येणार आहे. याशिवाय, २०१० पर्यंत राजधानी एक्सप्रेसमध्ये विशेष आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दहा नवे गरीब रथ आणि ५३ नव्या गाड्या
लालूंनी आपल्या भाषणात आणखी दहा नवे गरीब रथ तसेच ५३ नव्या रेल्वे गाड्या जाहीर केल्या आहेत. गरीब रथात पुणे-नागपूर हा गरीब रथ आठवड्यात तीन वेळा धावणार आहे. याशिवाय, १६ रेल्वे गाड्यांचा विस्तारही त्यांनी जाहीर केला. कंटेनर डब्यांसाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. देशाला यावर्षी बरेच काही देताना लालूंना आपल्या गावाचा मुळीच विसर पडला नाही. त्यांनी या अर्थसंकल्पात आपल्या गावासाठीही नवीन पॅसेंजर गाडी सुरू केली आहे.
नवे रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च याचवर्षी करण्यात येणार आहे. दिल्लीतील केंद्रीय रेल्वे रुग्णालय पूर्णपणे वातानुकुलीत करण्यासोबतच देशभरात हेरिटेज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. केरळमध्ये रेल्वेचे डबे तयार करण्याचा नवा कारखाना उभा होणार असून, त्यासाठी केरण सरकारने एक हजार एकर जागा कुठलाही मोबदला न घेता रेल्वेला दिली आहे, अजमेर लोको कारखान्यात २०० कोटी रुपयांची गुंतवणूक, भारतीय रेल्वेच्या खेळाडूंना मिळणाऱ्या भत्त्यांमध्ये वाढ करणे, मालगाड्यांना १५ टक्के जादा क्षमतेचे नवे डबे जोडणे, डिझेल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनचे उत्पादन वाढविणे, ५० मोठ्या टर्मिनलचा विस्तार, मालगाडी ५८ डब्यांची करणे, खाजगी जमिनीवर फे्रट टर्मिनल उभारणे, सर्व सुपरफास्ट गाड्यांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करणे, राजधानी एक्सप्रेसला २०१० पासून तर, शताब्दी एक्सप्रेसला २०१२ पासून नवे डबे जोडणे आणि याचवर्षी २० हजार नव्या डब्यांची निर्मिती करणे, १६५३८ किलोमीटरच्या जुन्या पटऱ्या बदलविणे, रेल्वेतील आगीपासून प्रवाशांचे रक्षण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित करणे आदी घोषणाही लालू यादव यांनी केल्या.
मुंबईसाठी "गो मुंबई कार्ड'
रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी "गो मुंबई कार्ड' सेवा सुरू केली आहे. या "स्मार्ट कार्ड' सुविधेचा फायदा लोकलमधून प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. मुंबईतील रेल्वे मार्गांचा विस्तार करण्यासाठी ७२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
१५ हजार संगणकीय काऊंटर
आगामी दोन वर्षात अतिरिक्त १५ हजार संगणकीय तिकीट काऊंटर सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. याशिवाय, स्मार्ट कार्डवर आधारित तिकीट योजनाही सुरू करण्यात येणार आहे. रेल्वे गाडीचे नियंत्रण ऑनलाईनवर करण्यात येणार असून स्वयंचलित तिकीट विक्रीची यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार आहे. काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवाशांच्या तक्रारी निवारण्यासाठी विशेष यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे.
Wednesday 27 February, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment