Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 February, 2008

आर्चबिशपांच्या पत्राचा
पोलिसांकडून गैरवापर
बाबूश मोन्सेरात यांचा आरोप

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - पणजी पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी सूडबुद्धीने आमदार बाबुश मोन्सेरात, त्यांच्या पत्नी जेनिफर व मुलाला तसेच पणजीचे महापौर टोनी रॉड्रीगीस यांना केलेल्या मारहाणीने निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर गोव्याचे आर्चविषप फिलीप नेरी फेरांव यांनी पोलिसांना झालेल्या मारहाणीबद्दल सहानुभूती व्यक्त केल्याचे वृत्त देऊन कामत सरकार गृहमंत्र्यांची अकार्यक्षमता झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे, असे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी एका पत्रकात म्हटले आहे. प्रत्यक्षात असे पत्र आपल्यालाही आले असून आर्चबिशपांनी आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना झालेल्या मारहाणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आपण जमशेदपूर येथे बिशपांच्या परिषदेस गेलो होतो, तेथून परतल्यावर मारहाण व संपत्तीची हानी करण्यात आल्याचे समजले, असे बिशपांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. असे पत्र खाजगी स्वरुपाचे असल्याने ते प्रसिद्धीस देणे आपल्याला योग्य वाटले नाही, पण सरकारने मात्र केवळ पोलिसांबद्दल बिशपांना सहानुभूती असल्याचे भासविण्यासाठी काही वृत्तपत्रांद्वारे त्यांच्या पत्राला प्रसिद्धी देण्याचा घाणेरडा डाव पोलिस खाते खेळत असल्याचा आरोप मोन्सेरात यांनी केला.
नागरी हक्क व लोकशाही तत्वांना हरताळ फासण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न शांतताप्रेमी गोमंतकीय कदापि खपवून घेणार नाही, असे मोन्सेरात यांनी म्हटले असून सौम्य वृत्तीच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करताना रवी नाईक यांची पोलिसांकरवी लोकप्रतिनिधींनाही मारहाण करण्यापर्यंत मजल गेली, अशी टीका बाबूश यांनी केली. यामागे मुख्यमंत्रिपद बळकाविण्याचा रवी नाईक यांचा डाव असल्याचे उघड होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिसांबद्दल अचानकपणे कळवळा व्यक्त करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांबद्दल बाबूश यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, पोलिस हे कायद्याचे रक्षक नसून त्यांनीच कायदा हाती घेतल्याचे ताज्या घटनांवरून दिसून येते, असे या पत्रकात बाबुश यांनी म्हटले आहे.

No comments: