Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 1 March, 2008

फोंडा पालिकेच्या बैठकीवर
सत्ताधारी गटाचा बहिष्कार
जनतेमध्ये तीव्र संताप

फोंडा, दि.२९ (प्रतिनिधी) - नगरपालिकेचे उद्यान मोडून तेथे पार्किंग व टेर्रास गार्डन तयार करण्याचा प्रस्ताव, पदपथ क्षेत्रातील दुकानदारांचे पुनर्वसन आणि दुकानदारांचे भाडे स्वीकारणे बंद करणे या तीन महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी फोंडा पालिका मंडळाची आज विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवर पालिकेतील सत्ताधारी गटाने बहिष्कार घातल्याने ही बैठक कोरम अभावी रद्द करावी लागली.
या विशेष बैठकीला विरोधी गटातील केवळ पाच नगरसेवक उपस्थित होते. महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याच्या सत्ताधारी गटाच्या कृतीचा व्यापारी व ग्रामस्थांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
या बैठकीस विरोधी गटाच्या नगरसेविका सौ. राधिका नाईक, सौ. रूक्मा डांगी, अँड. वंदना जोग, दिनकर मुंडये, शिवानंद सावंत, पालिका मुख्याधिकारी जयंत तारी, कायदा सल्लागार जी.व्ही. नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. पालिका मंडळाच्या घेण्यात आलेल्या बैठकीला नगराध्यक्षासह सत्ताधारी गटाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. संध्याकाळच्या बैठकीला नगराध्यक्ष आणि एकही सत्ताधारी गटातील नगरसेवक उपस्थित न राहिल्याने उपस्थित व्यापारी व नागरिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. कोरम पूर्ण न झाल्याने बैठक रद्द करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी श्री. तारी यांनी संध्याकाळी जाहीर केले. रद्द करण्यात आलेली ही बैठक पुन्हा कधी घेण्यात येणार याबद्दल काहीच सांगण्यात आले नाही. ही रद्द केलेली बैठक पुन्हा घ्यावीच लागणार असल्याचे नगरसेविका सौ. नाईक यांनी सांगितले.
पालिकेची इमारत तसेच गार्डन मोडून त्याठिकाणी पार्किंग व टेर्रास गार्डन उभारण्याचा प्रस्ताव, पदपथ क्षेत्रातील दुकानदारांचे पुनर्वसन आणि दुकानदारांकडून भाडे स्वीकारणे बंद करणे ह्या तीन प्रमुख विषयावर चर्चा करण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक घेण्याची मागणी पालिकेच्या विरोधी गटामार्फत दि. १५ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्षांकडे केली होती. गेल्या २५ फेब्रुवारी रोजी बैठकीची नोटीस काढण्यात आली होती. बैठक बोलाविलेले नगराध्यक्ष संजय नाईक बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल नगरसेविका राधिका नाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले. नगरसेविका सौ. नाईक म्हणाल्या की, ह्याला विरोध करण्यासाठी सध्या सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासंबंधी एक निवेदन पालिकेला सादर करण्यात येणार आहे. पालिका क्षेत्रात एकही सुसज्ज उद्यान नाही. अनेक उद्यानांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे पालिकेचे जुने गार्डन मोडू नका. पालिकेने गेल्या सप्टेंबर २००७ पासून पदपथ क्षेत्रातील दुकाने हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र, दुकानदारांचे पुनर्वसन करताना भेदभाव केला जात आहे. काही दुकानदारांना जादा जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर काही जणांना केवळ तीन मीटर जागा देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार करून त्यांच्यावर अन्याय केला आहे. या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे सौ. नाईक यांनी सांगितले.
पालिका प्रशासनाने काही दुकानदारांकडून भाडे स्वीकारण्यास नकार दिला असून यासंबंधी दुकानदारांनी चौकशी केली असता प्रशासकांनी दुकानांचे भाडे न स्वीकारण्याचा ठराव संमत केला असल्याचे त्यांना सांगण्यात आले. पालिका प्रशासक हा अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा सौ. नाईक यांनी केला.व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्र्वासन नगरसेवक शिवानंद सावंत यांनी दिले. यावेळी दिनकर मुंडये, सौ. रूक्मा डांगी, वंदना जोग उपस्थित होत्या. शहरातील महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित खास बैठकीला अनुपस्थित राहण्याच्या सत्ताधारी गटाच्या कृतीचा एक व्यापारी तथा भाजपचे माजी गटाध्यक्ष सुनील देसाई यांनी निषेध केला आहे. नगराध्यक्ष संजय नाईक आणि सत्ताधारी गटातील इतर सात नगरसेवकांचे वागणे बेजबाबदारपणाचे असून त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे श्री. देसाई यांनी सांगितले. या बैठकीत कशा प्रकारची चर्चा होते हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी व नागरिक उपस्थित होते. बैठक रद्द करण्यात आल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली असून अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढा देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी बुधवारपेठ व्यापारी संघाचे शंकर नाईक व इतर पदाधिकारी सुध्दा उपस्थित होते.

No comments: