नार्वेकरांनी नामानिराळे
होऊ नये ः बाबूश
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर यांनी कितीही सोज्वळपणाचा आव आणून आपल्यावरील आरोप फेटाळले असले तरी त्यांची ३५ वर्षांची "रंगेल' कारकीर्द सर्वांना माहीत असल्याचा प्रत्यारोप ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज पत्रकाद्वारे केला.
बाबूश व त्यांचे कुटुंबीय तसेच महापौर टोनी रॉड्रिगीस यांना पोलिस स्थानकात झालेल्या बेदम व अमानुष मारहाणीमागे पोलिसांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप करून यामागे नार्वेकर यांच्यासह एक पंचतारांकित हॉटेल उद्योजक व आयटी लॉबी असल्याचा आरोप बाबूश यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना नार्वेकर यांनी हे आरोप फेटाळत आपली कुकर्मे लपवण्यासाठीच हा आरोप होत असल्याचा खुलासा केला होता. बाबूश आपली बेकायदेशीर कृती लपवण्यासाठी साधेपणाचा आव आणीत असल्याचेही नार्वेकर यांनी म्हटले होते.
पोलिसांनी केलेल्या क्रौर्याला नार्वेकर कसे जबाबदार आहेत, याच्या मुळाशी न जाता खुद्द या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व करणारे अधीक्षक नीरज ठाकूर यांनी आपली मुक्तता होण्याच्या एक तासापूर्वी आपल्याशी संपर्क साधून स्वतःची इच्छा नसताना केवळ वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून ही मारझोड केल्याचे सांगितले, असे बाबूश यांनी सांगितले आहे. कायदामंत्री नार्वेकर यांनी या कृतीनंतर नीरज ठाकूर यांचे अभिनंदन केले, यावरून त्यांना झालेल्या आसुरी आनंदाचे मूळ त्यांच्या दोनापावला येथील आयटी हॅबिटेट प्रकल्पात असल्याचाही आरोप बाबूश यांनी केला. या प्रकल्पाद्वारे कोट्यवधीच्या घोटाळ्याचे ते प्रमुख लाभार्थी आहेत. ताळगाववासियांनी या प्रकल्पाला विरोध केला व आपण त्यांना साथ दिली त्यामुळे ताळगाववासियांबरोबर आपण व आपल्या कुटुंबियांना मारहाण झाल्याचा आनंद त्यांनी अधीक्षकांना शाबासकी देऊन व्यक्त केल्याचा टोमणाही बाबूश यांनी यावेळी हाणला.
पणजी पोलिस व गुंडांचे साटेलोटे उघड करण्यासाठी एका युवकाच्या मदतीला धावून गेल्याने आपल्यावर ही कारवाई झाली. नार्वेकर यांच्या ३५ वर्षाच्या रंगेल कारकिर्दीत विनयभंग प्रकरण, तिकीट घोटाळा आदींचा समावेश आहे. लोकांच्या विषयावरून आपल्याला पोलिस स्थानकात अटक व मारबडव झाली म्हणून भेकड वृत्तीने अस्वस्थतेचे सोंग पांघरून नार्वेकरांप्रमाणे इस्पितळात धाव घेतली नाही याची आठवणही त्यांनी करून दिली. नार्वेकर व त्यांच्या साथीदारांनी आपल्या स्वार्थासाठी बनावट तिकीट विकल्या व त्याचा परिणाम म्हणून निरपराध लोकांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार खावा लागला. या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांची अटक टाळण्यासाठी इस्पितळात झोपण्याचे सोंग घेणारे नार्वेकर आता कोणत्या तोंडाने दुसऱ्यांची सोंगे सांगत आहेत, असा सवालही बाबूश यांनी केला.
Sunday 24 February, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment