Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 25 February, 2008

पोलिस-ताळगावमधील
" गॅंगवार'मागे गृहमंत्रीच
पर्रीकर यांचा पुनरुच्चार

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - गेल्या दोन दिवसांपूर्वी पणजीत जे नाट्य घडले, ते ताळगावातील नागरिक व पोलिस यांच्यातील "गॅंगवॉर' असून याच्या मागील सूत्रधार हे गृहमंत्री रवी नाईक असल्याचा दावा आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्यामागे भाजपचा हात असल्याचा गृहमंत्र्यांच्या आरोप म्हणजे, एक मोठा विनोद असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले. गृहमंत्री रवी नाईक यांनी काल या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रतिउत्तर देताना आज पर्रीकर यांनी वरील मागणी केली.
भाजपला विद्यमान सरकार अस्थिर करण्याची गरज नसून उलट हे सरकार जास्त काळ राहणार तेवढीच त्या सरकारची लक्तरे वेशीवर टांगली जाणार असल्याचे ते म्हणाले. पोलिस स्थानकावर झालेल्या दगडफेकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी सर्वांत आधी भाजपनेच केली होती, असे म्हणून गृहमंत्र्यांनी रोज वृत्तपत्रे वाचावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
दि. १९ रोजी रात्री घटना घडल्या आहेत, त्याला दोन भाग आहेत. पहिला भागाचे भाजपने कधीच समर्थन केले नाही. मात्र दुसऱ्या भागात पोलिसांनी लोकप्रतिनिधीच्या बंगल्यात घुसून तोडफोड व निष्पाप मुलाला केलेल्या जबर मारहाणीचे कदापि समर्थन होणार नसल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
दि. १९ रोजी पोलिस स्थानकावर मोर्चा येणार असल्याची पूर्वकल्पना पोलिसांना मिळाली होती. तरीही, कोणतीच पूर्वतयारी पोलिसांनी केली नाही. सर्वांत आधी मोर्चा शंभर मीटरवर अडवला जातो. यावेळी पोलिसांनी तसे न करता, त्यांना पोलिस स्थानकापर्यंत येण्यास दिले. त्यानंतर महापौर टोनी रोड्रिगीस यांनी मुख्यमंत्री कामत यांना दूरध्वनी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाठवा अशी मागणी केली. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याठिकाणी न पाठवता परिस्थिती अधिक चिघळण्यास दिली, असा आरोप श्री. पर्रीकर यांनी यावेळी केला. या सर्व गोष्टी न्यायालयीन चौकशीत बाहेर येणार असल्याचे ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल गुन्हेगारांच्या भूमिकेत असलेल्या पोलिसांनाच करायला लावल्याने या संपूर्ण कटामागे गृहमंत्र्यांचाच हात असल्याचा संशय दाट होत असल्याचे ते म्हणाले. गृहमंत्री राजकारण करण्यासाठी पोलिस खात्याचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
कॉंग्रेस सरकार पाडण्यास भाजप सक्रिय असल्याचे गृहमंत्र्यांचे विधान हास्यास्पद असून गेल्या काही दिवसांत "कामत सरकार हाय हाय' म्हणून सरकारच्या विरोधात कोणी मोर्चा काढला होता, असा प्रश्न त्यांनी केली. उलट हे सरकार राहिल्यास ते आपल्याच कर्माने कोसळणार असल्याचे ते म्हणाले.

No comments: