Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 26 February, 2008

वादग्रस्त तीन पोलिस
अधिकाऱ्यांच्या बदल्या
निलंबनाची मंत्र्यांची मागणी

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)- पणजी पोलिस स्थानकावर ताळगाववासियांनी आणलेल्या मोर्चावेळी झालेला हल्ला व त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई या संपूर्ण प्रकरणात टीकेचे लक्ष्य बनलेले अधीक्षक निरज ठाकूर, उपअधीक्षक मोहन नाईक व पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांची आज तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र रात्री काही मंत्र्यांसह एका गटाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली, असे सूत्रांकडून समजले.
आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानावर सरकारातील काही मंत्री, आमदार तथा आघाडीच्या घटकांबरोबर चर्चा करून मुख्यमंत्री कामत यांनी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. निरज ठाकूर यांची गृहरक्षक विभागांत तर मोहन नाईक व सुदेश नाईक यांना राखीव पोलिस दलात पाठवण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांच्या बदलीत अधीक्षकपदी बॉस्को जॉर्ज, उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व निरीक्षक फ्रान्सिस कोर्त यांनी नेमणूक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
"काही का असेना परंतु न्यायाची चक्रे फिरू लागली आहेत ही समाधानाची गोष्ट आहे" अशी प्रतिक्रिया बाबूश मोन्सेरात यांनी व्यक्त केली आहे. "न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे' या म्हणीचा उल्लेख करीत या संपूर्ण प्रकरणी पोलिसांकडून अत्यंत निर्दयपणे मारहाण झालेल्या निरपराधी लोकांना लवकरात लवकर न्याय मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी आपण न्यायालयीन चौकशीची केलेली मागणी मुख्यमंत्री कामत यांनी मान्य केल्याचे सांगितले परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र याबाबत काहीही ठोस उत्तर देण्याचे टाळून सध्या प्राथमिक स्तरावर चौकशी सुरू असून त्यानंतर न्यायालयीन चौकशीबाबत ठरवू असा खुलासा केला.
सरकारने याप्रकरणी काहीही निर्णय न घेतल्यास त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सरकार याप्रकरणी गप्प बसल्याने पोलिसांविरोधातील वातावरणही बिघडू लागल्याने पोलिसही बिथरले होते. आघाडी सरकारातील बाबुश समर्थक गटाने मुख्यमंत्री कामत यांना तात्काळ कृती करण्याचा सल्ला दिल्याने अखेर तात्पुरता तोडगा म्हणून सदर तीनही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या निर्णयावर एकमत झाले.
पणजी महानगरपालिका कामगारांनी या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बेमुदत संपामुळे परिस्थिती आटोक्याबाहेर जाण्याची भिती निर्माण झाली होती. शहरात कचऱ्याचे ढीग पडल्याने सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरण्याची अवस्था बनून हे वातावरण आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांवरील कारवाई करणे अपरिहार्य बनल्याने अखेर हा निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. महापालिका कामगारांनी पुकारलेल्या संपाला राज्यभरातील इतर पालिका कामगारांकडूनही पाठिंबा मिळत चालल्याने या संपाचे पडसाद राज्यपातळीवर पसरू नयेत, यासाठी हा विषय निकालात काढावाच लागणार असा हट्ट नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी धरल्याने अखेर सरकारने नमते घेणेच पत्करले.
या बैठकीला गृहमंत्री रवी नाईक, वीज व पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा, नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव, डॉ. विल्फ्रेड डिसोझा, मुख्य सचिव जे. पी. सिंग, मुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव यदुवंशी आदी हजर होते.

No comments: