Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 29 February, 2008

महागाई आणखी वाढणार
आर्थिक सर्वेक्षणात चिंता

विकासदर ८.७ टक्के राहण्याचा अंदाज
महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा जास्त राहणार
दुहेरी आकड्यांचा विकासदर गाठण्याचे आव्हान
कृषी विकासाचाही दर घसरण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि.२८ - केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी संसदेत २००७-२००८ सालाचे आर्थिक सर्वेक्षण आज सादर केले. देशात सातत्याने वाढत असलेल्या महागाईवर अर्थमंत्र्यांनी या सर्वेक्षणात चिंता व्यक्त केलेली आहे. चालू वर्षादरम्यान महागाईचा सरासरी दर ४ टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. खाद्यवस्तूंच्या किंमतींमध्ये होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर महागाई आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदेशी मुद्रेचा वाढता प्रवाह, आर्थिक मंदी, विशेषकरून अमेरिकी आर्थिक मंदीचे महागाईवर होणारे प्रभाव, पायाभूत सुविधांमधील अडसर आदी बाबी भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने आहेत, असे सरकारने आज सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात म्हटलेले आहे.
अकराव्या पंचवार्षिक योजनेत ९ टक्के विकासदर गाठण्यात यश येईल, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. परंतु, महागाई वाढण्याचा धोका अद्यापही कायम आहे. महागाई आटोक्यात ठेवणे, हे सरकारसाठी मोठे आव्हानच राहणार आहे, असेही ते म्हणाले. रुपयाची मजबुती आणि पायाभूत सुविधांची कमतरता या बाबी देखील विकासाच्या मार्गातील सर्वात मोठे अडसर आहे, असे मानले जात आहे.
ग्राहकाभिमुख वस्तूंच्या विक्रीमध्ये घट झाल्याने सरकार चिंताग्रस्त आहे आणि यासंबंधी आवश्यक पावले उचलण्याच्याही दृष्टीने विचार करीत आहे. २००७-२००८ सालाच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, चालू वर्षी देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी राहण्याचा अंदाज आहे. गत वर्षी आर्थिक विकासाचा दर ९.६ टक्के होता, त्या तुलनेत चालू वर्षात विकासाचा दर ८.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
कृषी क्षेत्राचाही विकास दर घसरण्याची शक्यता या आर्थिक सर्वेक्षणात वर्तविण्यात आलेली आहे. कृषी क्षेत्राचा चालू वर्षाचा विकास दर २.६ टक्के राहण्याची अपेक्षा आहे. तथापि, २००७-२००८ या सालादरम्यान कृषी क्षेत्राचा विकास दर ३.८ टक्के राहिला. दुसरीकडे निर्मिती क्षेत्रातही विकासाचा दर ९.४ टक्के आणि निर्यात क्षेत्राच्या विकासाचा दर २०.३ टक्क्यांपर्यंत राहण्याची अपेक्षा वर्तविण्यात आली आहे. गेल्या वषीं निर्मिती क्षेत्राचा विकासदर १२ टक्के होता.
""जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची शक्यता लक्षात घेता विकासदरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. २००६-२००७ मध्ये गुंतवणुकीचा दर ३५.९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि येणाऱ्या वर्षात यामध्ये आणखी वाढ होईल. गुंतवणुकीची अभूतपूर्व पातळीच विकासदरातील तेजीचा मजबूत पाया म्हणून सिद्ध होईल,''असे अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी संसदेत २००७-२००८ सालचे आर्थिक सर्व्हेक्षण सादर केल्यानंतर संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments: