Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 24 February, 2008

जमाव हिंसक होण्याच्या वाढत्या घटना
हे तर न्यायदान प्रणालीचे अपयश!

नवी दिल्ली, दि. २३ -बिहारमधील संतप्त जमावाने रौद्र रूप धारण करण्याच्या घटनांवर राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "जमावाने रौद्र रूप धारण करण्याच्या वाढत्या घटना म्हणजे न्यायदान प्रणालीचे अपयश आहे,' असे त्या म्हणाल्या.
हाजीपूर येथे मोबाईल फोनच्या क्षुल्लक वादातून दोन विद्यार्थ्यांमध्ये जुंपली. शाब्दिक चकमकीचे पर्यवसान हाणामारीत झाले. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याला तीक्ष्ण हत्याराने भोसकले. या घटनेवरून जमाव संतप्त झाला. मारेकरी विद्यार्थ्याला त्यांनी पोलिस कोठडीतून बाहेर काढून रस्त्यावर आणले व सर्वांसमक्ष निर्दयीपणे झोडपून काढले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडला. ते असहाय होऊन हा प्रकार पाहत राहिले.
दरम्यान, बिहारमध्येच जमाव संतप्त होण्याची आणखी एक घटना घडली. या घटनेमध्ये आरोपी चोराला संतप्त जमावाने पोलिस कोठडीतून बाहेर काढून मरेस्तोवर लाथाबुक्क्यांचा प्रहार करून झोडपले. या दोन्ही घटनांचे वृत्त राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी ऐकल्यानंतर त्या सुन्न झाल्या. या घटनांवर त्यांनी नवी दिल्ली येथे भरलेल्या बार असोसिएशनच्या परिषदेत प्रतिक्रिया व्यक्त करताना "न्यायदान प्रणालीला उशीर होत असल्याने जमाव संतप्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या घटना म्हणजे न्यायदान प्रणालीचे अपयशच आहे,' असे उद्गार काढले.

No comments: