Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 25 May, 2011

खनिजवाहू ट्रकाने तरुणास चिरडले

रिवण भागात तणाव - संतप्त ग्रामस्थांनी रस्ता रोखला
केपे, दि. २४ (प्रतिनिधी): राज्यात खनिज वाहतुकीने निरपराधांचे बळी घेण्याचे सत्र सुरूच ठेवले असून आज मंगळवारी सकाळी ६.१५ वाजता रिवण- शिवसरे रस्त्यावर झालेल्या अपघातात फ्रान्सिस जिवाजी (२५) हा तरुण खनिजवाहू ट्रकखाली सापडून मृत्युमुखी पडला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या रिवणवासीयांनी रस्ता रोखून धरून आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान, जोपर्यंत पसार झालेल्या ट्रकचालकाला पोलिस पकडून आणत नाहीत तोपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी सुरुवातीला घेतली होती. मात्र, संध्याकाळी उशिरा मोहन बाबलो नाईक या ट्रकचालकाला अटक करण्यात आली तरीही लोकांनी रस्ता खुला करण्यास नकार दिला. या भागातून खनिज वाहतूक होऊच देणार नाही; झाल्यास ती पुन्हा रोखून धरू, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
सविस्तर माहितीनुसार, फ्रान्सिस जिवाजी हा सुळकर्णे येथील तरुण आज सकाळी ६.१५च्या सुमारास आपल्या पल्सर दुचाकीने फातोर्डा येथे कामावर जात होता. यावेळी रिवणाहून शिवसरे येथे जाण्यासाठी एक ट्रक अचानक रस्त्यावर उतरला व पल्सर त्या ट्रकखाली आली. या अपघातात फ्रान्सिस जागीच ठार झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच संतप्त लोकांनी घटनास्थळी गर्दी केली व रस्ता रोखून धरला. पोलिसांनी सकाळी ९ च्या सुमारास अपघाताचा पंचनामा केला व मृतदेह हॉस्पिसियोत पाठवून दिला.
दरम्यान, पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस, केपे उपअधीक्षक रोहीदास पत्रे, निरीक्षक भानुदास देसाई, राजू राऊत देसाई, मामलेदार सुदिन नातू यांनी अपघातस्थळी येऊन संतापलेल्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी आपला हेका सोडला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खनिज वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून सुरू व्हायला हवी. ती आधीच कशी सुरू होते? दिवसाला केवळ ६०० खनिज ट्रकांना परवानगी असताना सुमारे १५०० ट्रक या रस्त्याने कसे धावतात? वाहतूक पोलिसांचे इथे अजिबात नियंत्रण कसे नसते, यासारखे सवाल करत त्यांनी पोलिसांना धारेवर धरले. दरम्यान, संध्याकाळी उशिरा मोहन नाईक या ट्रकचालकाला अटक करण्यात आली. तरीही रात्री उशिरापर्यंत लोकांनी रस्ता खुला केला नव्हता. या भागातून खनिज वाहतूक होऊच देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

No comments: