Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 27 May, 2011

हा तर पोलिस आणि राजकीय गुंडांचा कट

जिल्हाधिकारी, पोलिस अधिकार्‍यांना निलंबित करा
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): पोलिस आणि राजकीय गुंडांनी संगनमत करून जाळपोळ आणि दंगलीचे प्रकरण घडवले. त्यांनी मंगेश गावकर (२६) आणि दिलीप ऊर्फ काटू वेळीप (२८) या दोघांचा पूर्वनियोजित कट रचून खून केला असल्याचा आरोप आज ‘उटा’ या भूमिपुत्रांच्या संघटनेने केला आहे. या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जावी, अशी मागणीही ‘उटा’ने केली आहे.
दरम्यान, घरी परतणार्‍या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याचा आदेश देणार्‍या जिल्हाधिकार्‍यांना आणि राजकीय गुंड ‘उटा’च्या कार्यकर्त्यांना मारहाण व जाळपोळ करताना केवळ बघ्याची भूमिका घेणारे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस आणि उपअधीक्षक महेश गावकर यांना तात्काळ निलंबित करावे; तोवर दोघाही तरुणांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृत मंगेश व दिलीपच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. ही चौकशी युद्ध पातळीवर केली जावी, अशी जोरदार मागणी आज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी केली. मृत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही तोवर ‘उटा’ शांत बसणार नसल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. ते आज पणजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पैंगीणचे आमदार रमेश तवडकर व गोविंद गावडे उपस्थित होते.
अत्यंत हुशार आणि उच्चशिक्षित असलेला मंगेश गावकर हा आदर्श भवनाला आग लागल्यानंतरही सुखरूप होता. आदर्श भवनाला आग लागली होती त्यावेळी त्याने एकाला फोन करून आपण सुखरूप असल्याचे सांगितलेही होते. त्यानंतर आडमार्गाने येत असताना पोलिसांनी त्याच्या पायावर दंडुका हाणून त्याला खाली पाडले व केवळ जाळपोळ करण्यासाठीच आलेल्या स्थानिक गुंडांनी त्याला आदर्श भवनाच्या खोलीत डांबून आग लावली. हे सगळे पोलिसांच्या देखत झाले आहे, अशी माहिती श्री. वेळीप यांनी यावेळी दिली. या राजकीय गुंडांना त्वरित अटक करण्याचाही मागणी यावेळी करण्यात आली.
मागण्या मान्य झाल्यानंतर पुढची बैठक मडगाव येथे मुख्यमंत्र्यांबरोबर होणार होती. त्यामुळे वेगवेगळ्या गावांतून जमलेले दहा हजार कार्यकर्ते आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात जिल्हाधिकार्‍यांनी लाठीमार करण्याचे आदेश दिले. याच गोंधळात काही राजकीय गुंडांनी येथे येऊन हैदोस घालण्यास सुरुवात केली. या गुंडांनी आमदार रमेश तवडकर व आपल्यावरही हल्ला चढवला. यावेळी पोलिस आणि ते गुंड एकत्रितपणे काम करीत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. ज्या लोकांचा आंदोलनाशी कोणताही संबंध नाही असे लोक त्या ठिकाणी आले होते. ज्या ठिकाणी आमदार आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यापासून एका किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या आदर्श भवनाला या गुंडांनी आग लावली. आंदोलनानंतर सर्व नेते आदर्श भवनात जाणार असल्याची त्यांना कल्पना असल्याने त्यांनी आम्हा सर्वांना एकत्रित जाळून मारण्याचाच कट रचला होता, असा दावाही यावेळी श्री. वेळीप यांनी केला.
प्रत्यक्ष घटनेविषयी माहिती देताना आमदार रमेश तवडकर म्हणाले, ‘मी आणि काही कार्यकर्ते बाळ्ळी येथे उभे होतो. त्या ठिकाणी पंधरा जणांचा गट आला आणि त्यांनी आपल्याला घेराव घातला. यातील दोघांनी आपल्या थोबाडीत मारले तर काहींनी बुक्केही लगावले. त्या ठिकाणी असलेल्या काही स्थानिक पत्रकारांनी माझी त्यांच्यापासून सुटका करून बाजूच्या एका घरात आश्रयाला नेले.’’ पूर्वनियोजित कट करून हे गुंड आम्हांला संपवण्यासाठीच त्या ठिकाणी आले होते, असा दावाही त्यांनी केला.
आदर्श संस्थेच्या दोन गोदामांना आग लावण्यात आली आहे. २० ते २५ दुचाक्यांना आगी लावण्यात आल्या. आंदोलनानंतर आदर्श भवनात सहा कार्यकर्ते गेले होते. आग लागल्यानंतर त्यातील काही जण बाहेर आले. अग्निशमन दलाची मदतही उशिरा मिळाली. तसेच, जखमी अवस्थेत इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या ‘उटा’च्या कार्यकर्त्यांना आधी पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल केले, असाही आरोप करण्यात आला. या सर्व प्रकारची मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे श्री. तवडकर म्हणाले.
-------------------------------------------------------------------
स्थानिकांशी वैर नव्हतेच..
गेली आठ वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन पुकारले होते. या आठ वर्षांत सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच आमच्यावर ही परिस्थिती ओढवली. आमचा लढा होता तो सरकारशी. स्थानिकांशी आमचे कोणतेही वैर नव्हते आणि त्यांचा आम्हांला विरोधही नव्हता. आंदोलकांचे असे मुडदे पाडणार असाल तर आम्ही भूमिपुत्रांनी आमच्या भावना कोणाकडे व्यक्त कराव्यात, असा रोकडा सवाल माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी केला.

1 comment:

Unknown said...

We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the

most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi

offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi