Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 28 May, 2011

..अन्यथा संपूर्ण गोव्यात वणवा पेटेल!

‘उटा’तर्फे सरकारला २४ तासांची मुदत
‘उटा’चे पणजीत धरणे आंदोलन

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करणार्‍या ‘उटा’च्या दोन तरुण सदस्यांना बाळ्ळी येथे जाळून ठार मारण्याची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना असून ती शासन पुरस्कृत आहे. याप्रकरणी संघटनेने केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी सरकारने अमान्य केली आहे. त्यामुळे आता मानवी हक्कांसाठी निर्वाणीचा लढा देण्याची वेळ आमच्यावर आली असून येत्या २४ तासांत सरकारने हे हत्या प्रकरण ‘सीबीआय’कडे न दिल्यास ‘उटा’चे आंदोलन गोवाभर पसरेल आणि त्यात संपूर्ण गोवा पेटेल, असा कडक इशारा ‘उटा’चे नेते प्रकाश वेळीप यांनी आज दिला.
पणजी येथील आझाद मैदानावर मृत मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी यासाठी आयोजित धरणे आंदोलनाच्या समारोपप्रसंगी श्री. वेळीप बोलत होते. हे धरणे आंदोलन उद्याही सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
या धरणे आंदोलनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार रमेश तवडकर, आमदार मिलिंद नाईक, वासुदेव मेंग गावकर, कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, साहित्यिक विष्णू वाघ, माजी मंत्री डॉ. काशीनाथ जल्मी, ‘उटा’चे नेते गोविंद गावडे, कांता गावडे, ऍड. गुरु शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या या धरणे आंदोलनात कॉंगेे्रसचे माजी मंत्री मामा कार्दोझ, आमदार पांडुरंग मडकईकर, आमदार दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, शिवसेना नेते दामू नाईक आदींनी भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.
प्रकरण राष्ट्रीय पातळीवर नेणार : पर्रीकर
दिगंबर कामत यांनी ‘उटा’च्या मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन आमदार रमेश तवडकर यांना विधानसभेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीही केले नाही. हे सरकार खोटारडे असून शांत आंदोलकांवर लाठीमार करणे, दोघा तरुणांना जिवंत जाळून त्यांची हत्या करणे व आमदार तवडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणे असे गंभीर अपराध या सरकारने केले आहेत. या प्रकरणी आपण मुख्यमंत्री व सभापतींना पत्र पाठवले असून भूमिपुत्रांचा हा प्रश्‍न राष्ट्रीय पातळीवर नेणार, अशी घोषणा यावेळी मनोहर पर्रीकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ः तवडकर
‘उटा’च्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार व दोघांची झालेली हत्या याला मुख्यमंत्री दिगंबर कामत हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी रमेश तवडकर यांनी केली. गोव्यात सरकार नावाची चीज अस्तित्वाचाच नाही. विविध वृत्तवाहिन्यांवरील दृश्ये पाहिल्यास खुनी कोण आहेत ते सहज कळून येईल. सरकारला जरा जरी चाड असेल तर त्यांनी या हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
मंगेश, दिलीपचे मृतदेह बेवारशी?
दरम्यान, आज सकाळी धरणे आंदोलन सुरू होताच पोलिसांनी मंगेश गावकर व दिलीप वेळीप यांचे मृतदेह बेवारशी ठरवून त्यांची शवचिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. हे समजताच प्रकाश वेळीप व इतर नेते बांबोळी येथे धावून गेले व त्यांनी सदर मृतदेह बेवारशी नसल्याचे पोलिसांना ठणकावून सांगितले. या मृतदेहांना हात लावाल तर खबरदार, असा दम त्यांनी डीन डॉ. जिंदाल यांना भरला. नंतर याविषयी सविस्तर माहिती देताना प्रकाश वेळीप म्हणाले की, कामत सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ‘उटा’चे दोन उमदे तरुणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यामुळे ‘उटा’च्या मागण्या मान्य होईपर्यंत व जळीतकांडाची न्यायालयीन चौकशी सुरू होईपर्यंत त्यांचे मृतदेह ताब्यात घेणार नाही. या दोन शहिदांच्या मृतदेहाला कुणी हात लावला तर ‘उटा’ कायदा हातात घेईल, असा इशाराही त्यांनी दिला.
‘उटा’च्या दोन युवा कार्यकर्त्यांचा खूनच झाला असल्याचे प्रतिपादन पांडुरंग मडकईकर यांनी केले व या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश न दिल्यास आपण आपल्या पदांचा त्याग करू अशी घोषणा केली. गोव्यातील बहुजन समाज ‘उटा’मागे ठामपणे उभा असून त्यांच्यावरील अन्याय कदापि सहन केला जाणार नाही. त्यांच्या आंदोलनात संपूर्ण गोवा सहभागी होईल, असे प्रतिपादन आमदार दयानंद मांद्रेकर यांनी केले.
--------------------------------------------------------------
.. तर कॉंग्रेसचा त्याग : वाघ
मंगेश गावकर व दिलीप वेळीप या तरुणांची हत्या शासन पुरस्कृत आहे, हे स्पष्ट आहे. कामत सरकार हे आम आदमीचे सरकार नसून ते गुंडपुंडांचे सरकार आहे याचा प्रत्यय वारंवार आला आहे. मूठभर लोकांच्या दबावापुढे झुकून मातृभाषेचा गळा घोटला जातो, भूमिपुत्रांवर हल्ला करून त्यांना ठार केले जाते. हे सारे असह्य असून येत्या दहा दिवसांत माध्यमाचा निर्णय न फिरवल्यास व ‘उटा’ला न्याय न दिल्यास माझ्यासह असंख्य कॉंग्रेसजन कॉंग्रेसचा त्याग करतील असा इशाराही विष्णू सूर्या वाघ यांनी दिला.

1 comment:

Unknown said...

We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the

most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi

offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


modeling agencies in Delhi
modeling agencies
modeling jobs
modeling auditions
model coordinators
modeling jobs in Delhi