Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 15 October, 2010

राष्ट्रकुलचे सूप वाजले!

यजमान भारताला पदकतक्त्यात दुसरा क्रमांक
नवी दिल्ली, दि. १४ : कोसळलेली बांधकामे, आकंठ भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यांमुळे "गाजलेल्या' एकोणीसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप आज येथे वाजले. दिल्लीवासीयांना या संपूर्ण स्पर्धेच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. आतषबाजी, रंगाची उधळण आणि कला - संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा अनुभवत
या स्पर्धेची सांगता झाली. ज्वाला - आश्विनी आणि सायना नेहवाल यांनी बजावलेली सुवर्णमयी कामगिरी क्रीडाप्रेमींना मोठाच दिलासा देऊन गेली. त्यामुळे पदकतक्त्यात यजमान भारताने दुसरा क्रमांक पटकावला.
गुरुवारी हॉकीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेला दारुण पराभव भारताच्या जिव्हारी लागला. १९८२ च्या एशियाडमध्ये असाच लाजिरवाणा पराभव आपल्या संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर आठच दिवसांनी भारताने पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला होता.
ज्वाला - अश्विनी आणि सायना नेहवाल यांनी अप्रतिम कामगिरी करत जिंकलेल्या सुवर्णपदकांनी भारताला या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून दिला. त्यामुळे गेले बारा दिवस सुरू असलेला या सोहळ्याच्या शेवट भारतासाठी मैदानावरही गोडच झाला. या शेवटानंतर सुरुवात झाली ती सांगता सोहळ्याला. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तो रंगला आणि २०१० च्या या राष्ट्रकुलचे अखेर सूप वाजले.
कडेकोट बंदोबस्त आणि हाऊसफुल्ल गर्दीच्या या सोहळ्यासाठी साऱ्या दिल्लीचे रस्ते आज नेहरू स्टेडियमच्या दिशेने वळले होते. लष्करी वाद्यवृंदाने संचलन केल्यानंतर सोहळ्याची सुरुवात झाली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्यासह अनेक मंडळी या सोहळ्या उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे उपस्थित होते.
भारताने राष्ट्रकुलमध्ये ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्रॉंझ अशी तब्बल १०१ पदके जिंकली आणि आधीचा आपला ३० सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडला.

No comments: