Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 10 October, 2010

आमदारांना विमानात विनातिकीट प्रवेश!

दाबोळीतील नाट्य, सुरक्षानियम धाब्यावर
वास्को, दि. ९ (प्रतिनिधी): कसलीही अधिकृत कागदपत्रे नसताना, विमानातून जाण्यासाठी तिकीट नसताना आज दुपारी दाबोळी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने कर्नाटकातील त्या १४ आमदारांपैकी १२ जणांना आत प्रवेश दिल्याने येथील तसेच केंद्र सरकार कशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी सुरक्षेची पण धज्जा उडवू शकते हे दिसून आल्याने त्याविरुद्ध आवाज उठवीत गोवा भाजप नेत्यांनी येथील सुरक्षा यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली आहे. "जेडीयु' पक्षाबरोबरच कॉंग्रेस पक्षही कर्नाटकचे सरकार अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर व कर्नाटकातील काही भाजप नेत्यांनी आज येथे केला.
आज दुपारी तीन वाजल्यापासून दाबोळी विमानतळावर हळूहळू करून वाढलेली पोलिस संख्या तसेच इतर सुरक्षा यंत्रणेची मोठ्या प्रमाणात वाढलेली लगबग पाहून प्रवाशांत सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले. दाबोळी विमानतळावर ही सुरक्षा कुठल्याच प्रकारच्या आपत्तीमुळे नसल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रवाशांना हायसे वाटले.
जेडीयु व कॉंग्रेसच्या नेत्यांनी गोव्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या १४ आमदारांपैकी १२ जणांना कर्नाटकला नेण्यासाठी हे पोलिस तैनात केल्याचे लक्षात येताच लोकांतही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेकांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी तीनच्या सुमारास कर्नाटकातील जेडीयु पक्षाचे खासदार चल्लूराय स्वामी, आमदार जमीर अहमद व इतर नेत्यांनी दक्षिण गोव्याच्या तारांकित हॉटेलात असलेल्या त्या १४ आमदारांपैकी १२ जणांना दाबोळी विमानतळावर आणले. त्यांच्याकडे कुठलीच अधिकृत कागदपत्रे नव्हती. विमानतळावरून जाण्यासाठी तिकीट नसताना त्यांना विमानतळाच्या आत प्रवेश देऊन तेथील सुरक्षेच्या नियमांचे उलंघन केल्याचे गोव्याचे भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, पर्रीकर व इतर नेत्यांना कळताच त्यांनी दाबोळी विमानतळावर त्वरित दाखल होऊन याबाबत येथील सुरक्षा यंत्रणेला जाब विचारला. मात्र त्यांना याबाबत ठोस उत्तर मिळाले नाही, असे
भाजप खासदार (कर्नाटक) रमेश कट्टी यांनी सांगितले. काल रात्री त्या १४ आमदारांशी आमची चर्चा झाली असल्याची माहिती रमेश यांनी दिली. त्यांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच आज जेडीयु व कॉंग्रेस नेत्यांनी त्यांचे बळाच्या जोरावर अपहरण केले, असा आरोप रमेश यांनी केला.
मात्र कॉंग्रेस व जेडीयु यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार या सर्वांना पुरून उरेल, असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला.
दरम्यान आज झालेल्या विमानतळावरील मालिकेबाबत माहीती घेण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला. जेडीयु आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना गोव्यात दाखल झालेले ते १४ आमदार पुन्हा भाजपला समर्थन देणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी आज काही आमदारांचे अपहरण केले, असा आरोप पर्रीकर यांनी केला. काहींना धाकदपटशा दाखवण्यात आल्याचा आरोपही पर्रीकरांनी केला.
सदर १२ आमदारांकडे अधिकृत कागदपत्रे नसताना सुरक्षा व्यवस्थापनाने नियमांचे उल्लंघन करीत देशाच्या सुरक्षेला एके प्रकारे धोक्यात घातल्याचा दावा पर्रीकर यांनी केला. याबाबत आम्ही तक्रार नोंदविल्याची माहिती त्यांनी दिली. यातील २ आमदार भाजपसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री आपण त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, कॉंग्रेस व जेडीयुने आज बळजबरीने त्यांना हॉटेलमधून उचलून नेले. कर्नाटकातून गोव्यात आलेल्या आमदारांपैकी काही जणांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आम्ही पोलिसात दिली असता त्यांनी याबाबत चौकशी न करता तेही या कामात गुंतल्याचे पर्रीकर यांनी सांगून "अटाला' सारख्या गुन्हेगाराला पळवण्यास कारणीभूत असलेल्या पोलिसांकडून आणखी काय अपेक्षा करणार, असा प्रश्न त्यांनी केला.
त्या १२ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस व जेडीयुचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही पर्रीकर यांनी केला.
एका आमदाराला तर जबरदस्तीने मद्य पाजण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. तो शुद्धीत नसून अशा माणसालाही विमानातून नेणे बेकायदा असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्वार्थासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घातल्याने भाजप याविरुद्ध जोरदार आवाज उठवणार असल्याचे पर्रीकर यांनी शेवटी सांगितले.

No comments: