Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday 12 October, 2010

मनोरंजन संस्थेत लाखोंचा घोटाळा

चित्रपट महासंघाचा ढळढळीत आरोप
पणजी, दि. ११ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील लघुपट स्पर्धा आणि "टी - २०' च्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्य अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी लघुपट स्पर्धेसाठी केवळ १८ लाख रुपये खर्च येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र ७५ लाख रुपये मंजूर करून घेतल्याचे उघडकीस आले असून उरलेले ५७ लाख कुणासाठी, असा सवाल आज चित्रपट महासंघाने उपस्थित केला.
आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपट महासंघाने २०१० च्या चित्रपट महोत्सवातून लघुपट स्पर्धा आणी "टी - २०' त्वरित रद्द करण्याची मागणी केली व या संदर्भात मुख्यमंत्र्याचा निवेदनही देण्यात आले असल्याचे आर्नाल्ड डीकॉस्टा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद म्हाडगुत, डॉ. प्रमोद साळगावकर, लक्ष्मीकांत शेटगावकर व ज्ञानेश्वर गोवेकर उपस्थित होते.
मनोरंजन संस्थेचे मुख्य अधिकारी मनोज श्रीवास्तव हे पत्रकारांना खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. २००८ च्या चित्रपट महोत्सवातील लघुपट स्पर्धेसाठी ७५, ६३, २५६ एवढा निधी खर्च झाल्याचे सांगून त्यांनी तो मिळवला. मात्र आता ते केवळ १८ लाख रुपयेच खर्च झाल्याचे सांगतात. माहिती हक्क कायद्याखाली मिळालेल्या माहितीतून हा घोटाळा उघडकीस आला असल्याचे आर्नाल्ड डीकॉस्टा यांनी सांगितले.
मनोरंजन संस्थेत विविध मार्गातून अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचेच यातून सिद्ध होते असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या लघुपट स्पर्धेसाठी आणि "टी - २०' वर होणारा ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च हा वायफळ असून प्रत्यक्षात गोमंतकीयांना त्याचा काहीच फायदा होत नाही. गोवा सरकारच्या पैशातून आपली व आपल्या मर्जीतील लोकांची तिजोरी भरण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्याच आला.
लघुपट स्पर्धा आणी "टी - २०' यांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च निरुपयोगी असून गोमंतकीयांना खऱ्या अर्थाने चित्रपट महोत्सवाचा फायदा करून द्यायचा असेल हा वायफळ खर्च रोखून तो वर्षभर चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध गोष्टींवर किंवा कार्यशाळा आयोजित करण्याकरिता उपयोगात आणावा असे प्रतिपादन यावेळी लक्ष्मीकांत शेटगांवकर यांनी केले.
या संदर्भातील गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांनी दि. १३ रोजी केंद्र सरकारशी करार करण्यापूर्वी याबाबतीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात येणाऱ्या समितीत दोन सदस्य हे चित्रपट महासंघाचे असावेत या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे मिलिंद म्हाडगुत यांनी सांगितले.

No comments: